Pakistan Army Violence in Balochistan : संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार विभागाने पाकिस्तानची चांगलीच कानघडणी केली आहे. यूएनच्या मानवाधिकार तज्ज्ञांनी पाकिस्तानला बलुचिस्तानमधील मानवी हक्क उल्लंघनाच्या घटनांकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. बलुचिस्तान प्रांतातील लोक बेपत्ता होत आहेत. आतापर्यंत बलुचिस्तानमधील शेकडो लोक बेपत्ता झाले असून यूएनने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी संरक्षण दलं, तपास यंत्रणांकडून नागरिकांना यातना दिल्या जात असल्याचं यूएनच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
बलुचिस्तान प्रांतात संरक्षण दलांकडून हिंसा घडवली जात असून हत्येच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. यासंबंधीचा अहवाल पाहून यूएनने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी उपाययोजनांच्या अत्यधिक व हिंसक कृतींवर तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानी सरकारला आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्ण आदर करण्याचं आवाहन केलं आहे.
बलुचिस्तानमध्ये मानवी मूल्यांना धोका निर्माण झालाय : यूएन
यूएनच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे की लोकांची कायदेशीर मार्गाने होणारी आंदोलने, मानवी हक्कांसाठी केली जाणारी मागणी व निदर्शने यांचा थेट दहशतवादाशी संबंध जोडून पाकिस्तानी सरकार जनतेविरोधात, अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करतंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा व लोकांच्या एकत्र येण्यावर गदा आणत आहे. यामुळे मानवी मूल्यांना धोका निर्माण झाला आहे.
यूएनने म्हटलं आहे की “बलुचिस्तानमध्ये सातत्याने इंटरनेट ब्लॅकआऊट केलं जात आहे. या ब्लॅकआऊटमुळे माहिती स्वातंत्र्य, पारदर्शकता, जबाबदारी, राजकीय सहभाग व नागरिकांचे कल्याण या गोष्टींना बाधा पोहोचली आहे.”