नवी दिल्ली : देशभर करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने होत असला तरी, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यात येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका लांबणीवर टाकण्यास विरोध केला असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या पाहणी दौऱ्यावर असलेले केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय नेत्यांच्या जंगी जाहीरसभा होत आहेत. या सभांना होणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, ‘निवडणुका कधी घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे’, असे स्पष्ट करत करोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी या वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने करोनाच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केली होती व त्यानंतर उत्तर प्रदेशचा तीन दिवसांचा पाहणी दौरा निश्चित केला होता. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक ४०३ जागा असून राज्यात २०१७ मध्ये ७ टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. यावेळीही ७-८ टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदानाची प्रक्रिया जितकी अधिक काळ सुरू राहील तितका करोनाच्या प्रादुर्भावाचा धोकाही वाढू शकतो. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी आहे. तिथे आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले व त्यापैकी ३ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती चंद्रा यांनी लखनऊमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर

उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्येही करोनासंदर्भातील दक्षता घेऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल़ तसेच, पात्र कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा दिली जाईल. मतदार केंद्रांची संख्या वाढवली जाणार असून तिथला परिसर निर्जंतुकीकरण केला जाईल, अशा अनेक उपाययोजना अमलात आणल्या जाणार आहेत.