Donald Trump on India-Pakistan : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. तसेच त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामाचा करार झाला.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर शस्त्रविरामाचा तोडगा काढल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केल्याचंही पाहायला मिळालं. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान तणावावर भाष्य केलं आहे. ‘जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची पातळी पाहिली तर ती चांगली गोष्ट नव्हती’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी याला मोठं यश असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, “जे घडलं (शस्त्रसंधी) त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मला आशा आहे हे असंच राहील. भारत आणि पाकिस्तानची शस्त्रसंधी झाली हे मोठं यश होतं. जर तुम्ही दोघांमधील तणावाची पातळी पाहिली तर ती चांगली गोष्ट नव्हती”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी काय म्हटलं होतं?

भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. ट्रुथ सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर झालेल्या चर्चेनंतर मला हे जाहीर करायला आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाली. दोन्ही देशांनी योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता

दरम्यान, भारताने ट्रम्प यांच्या दाव्याचं खंडन केलं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहा मुद्यांचं निवेदन जाहीर करत अमेरिकेने शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला. तसेच शस्त्रविरामासाठी व्यापार कारणीभूत नसल्याचंही म्हटलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओंनी केलेल्या चर्चेच्या आधारावरच शस्त्रविरामाचा निर्णय घेण्यात आल्याचं भारताने ठामपणे सांगितलं होतं.