पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मातृशक्ती महाकुंभच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या ठिकाणी पंतप्रधानांनी कार्यक्रमासाठी जमलेल्या महिलांना संबोधित करताना नवीन उत्तर प्रदेशला पुन्हा कधी अंधारात ढकलता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. मात्र मोदींच्या या सभेनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करताना आणि सरकारच्या कामावर ताशेरे ओढताना दिसत आहेत.

मोदींविरोधात बोलणाऱ्या या महिलांचा व्हिडीओ सर्वसामान्यांपासून ते काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत अनेकांनी शेअर केलाय. मोदींच्या बैठकीमधून परतणाऱ्या महिलांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यानंतर या महिलांनी मोदी सरकारविरोधीत आपला संताप व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे समजणं गरजेचं आहे की त्यांच्या सभेमधून महिला नाराज होऊन बनारसला जात आहे. महागाई वाढवून मोदींनी आम्हा सर्वांना निराश केलंय, असं या महिला सांगताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघामधून आलेल्या एका महिलेने, आम्ही भाजपाला मत देणार नाही असं सांगितलं. आम्हाला तुम्ही वेडं समजलात काय?, असा प्रश्नही संतापून या महिलांनी विचारलाय. जर त्यांना जनतेची समस्याच ऐकून घ्याच्या नव्हत्या तर त्यांनी आम्हाला वाराणीहून का बोलावलं?, असा प्रश्न अन्य एका महिलेने विचारलाय. गहू, तांदूळ, मिठं हे सारं आता निवडणूक जिंकण्यासाठी दिलं जातं आहे. गरिबांसाठी ते काहीच करत नाहीयत. यंदा आम्ही १०० टक्के त्यांना मत देणार नाही, असं अन्य एक महिला सांगताना दिसतेय.

नक्की पाहा >> भाजपाच्या प्रचारादरम्यान दारु वाटप?; ‘सबका साथ.. सबका विकास.. सभी को शराब’ म्हणत नेत्याने शेअर केला व्हिडीओ

माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदींवर निशाणा साधलाय. “मोदींच्या सभेला आलेल्या महिलाच त्यांच्यावर एवढी टीका करत आहेत. या महिलेचं चेहरे ब्लर करायला हवे होते. या महिलांना त्यांचा हक्क तर नाही मिळाला पण टीका केल्याबद्दल योगीजी त्यांच्यावर खटला नक्की दाखल करतील,” असं सूर्य प्रताप सिंह कॅप्शनमध्ये म्हणालेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, मोदींनी काल महिलांसोबत संवाद साधला. त्यांच्या या संवादाचे खरं रुप महिलांच्या तोंडून ऐका, असं म्हटलंय.