MEA Press Conference on POK :भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झालेला असला तरीही सीमावर्ती भागात दहशतवाद्यांबरोबर चकमकी सुरू आहेत. आज झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्माही झाला. दरम्यान, आजही परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका स्पष्ट केली. भारताने शस्त्रविराम पुकारलेला असला तरीही भारत-पाकिस्तानातील समस्या द्विपक्षीय करार पद्धतीनेच सोडवले जातील, असं भारताने पाकिस्तानला बजावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

“आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे की जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले पाहिजेत. त्या धोरणात बदल झालेला नाही. २६/११ च्या हल्ल्यावेळीही भारताने प्रत्युत्तर दिलं होतं. पाकिस्तान थांबला तर भारत थांबेल. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामी करावा हा प्रलंबित मुद्दा आहे”, असं रणधीर जयस्वाल म्हणाले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने केलेल्या ताज्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आपण पाकिस्ताकडून आलेले विधान ऐकलंय. औद्योगिक स्तरावर दहशतवादाला पोसणाऱ्या राष्ट्राने आपण यातून वाचू शकू असा विचार करणेच मूर्खपणाचे आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी पायाभूत सुविधांची ठिकाणे केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार होती. हे पाकिस्तानला ते जितक्या लवकर समजेल तितकंच चांगलं आहे.”

व्यापाराचा मुद्दा चर्चेत आला नाही

७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून १० मे रोजी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबतच्या निर्णयापर्यंत भारतीय आणि अमेरिकन नेत्यांमध्ये विकसित होत असलेल्या लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. पण या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा आला नाही”, असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.