Vaishno Devi Landslide Jammu Kashmir Floods : जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील स्थिती खराब झाली आहे. कटरा येथील वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर बुधवारी (२७ ऑगस्ट) दरड कोसळली असून या दुर्घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २३ जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणांवरून दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. मातीच्या ढिगाऱ्यांमुळे, मोठमोठे दगड कोसळल्यामुळे जम्मू-कटरा महामार्ग बंद झाला आहे. यासह इतरही काही छोटे रस्ते बंद झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे नॉर्दन रेल्वेने बुधवारी त्यांच्या २२ ट्रेन रद्द केल्या आहेत. तर २७ ट्रेन अर्ध्यातच थांबवल्या आहेत (शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत). यामध्ये वैष्णो देवी बेस कॅम्पवरून चालवल्या जाणाऱ्या नऊ ट्रेन्सचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील त्रिकूट येथील एका डोंगरावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठी दुर्घटना घडली आहे. या मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतलं असून दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जम्मू-काश्मीरवासीयांसमोर एकाच वेळी अनेक आव्हानं

मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरमधील अनेक लहान मोठ्या नद्या व ओढ्यांना पूर आला आहे. तसेच अनेक भागांतून दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. जम्मूमध्ये एका नदीवरील पूल वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे असंख्य गावांमध्ये वीज नाहीये. मंगळवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत अवघ्या सहा तासांत २२ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्री पाऊस थोडा कमी झाल्याने काही भागांमधील पाणी ओसरलं आहे. परंतु, पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही.

३,५०० लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

मुसळधार पाऊस व पुरामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. परिणामी बचाव पथकांनी व प्रशासनाने धोकादायक स्थिती असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हालवलं आहे. काल (२६ ऑगस्ट) दिवसभरात ३,५०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनं, जम्मू-काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर व स्थानिक व्हॉलेन्टियर्सद्वारे ठिकठिकाणी बचावकार्य चालू आहे. बाधित लोकांसाठी काही ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे त्यांच्यासाठी अन्न, स्वच्छ पाणी व वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

मुसळधार पाऊस, दरड कोसळल्याची दुर्घटना, अनेक भागांमधील पूराची स्थिती पाहता श्राईन बोर्डाने भाविकांच्या सुरक्षेसाठी वैष्णो देवी यात्रा स्थगित केली आहे. भैरव घाटी मार्गावर भूस्खलन झाल्याने या मार्गावरील घोडा, खेचर व पालखी सेवा स्थगित करण्यात आली आहे.