Vijay Mallya on returning to India : भारतात अनेक फसवणुकीच्या आरोपांना तोंड देत असलेले किंगफिशर एअरलाइन्सच माजी प्रमुख आणि उद्योजक विजय माल्या याची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. पॉडकास्टर राज शमानी यांच्याशी केलेल्या चार तासांच्या चर्चेत माल्या याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. गुरूवारी प्रसिद्ध झालेल्या या पॉडकास्टमध्ये विजय माल्या याने भारतात कधी परतणार? या प्रश्नाचे देखील उत्तर दिले आहे. तसेच चोर आणि फरार म्हणून संबोधले जात असल्याबद्दल देखील मत व्यक्त केले आहे.
भारतात परत न आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याबद्दल विचारले असता विजय माल्या याने उत्तर दिले की, तो म्हणाला की, “भारतात जर मला निष्पक्ष खटला आणि सन्मानाने राहण्याची हमी देण्यात आली, तर तुम्ही बरोबर ठराल, पण ती मला मिळाली नाही.” त्यानंतर माल्या याला विचारण्यात आले की, जर निष्पक्ष खटला चालवला जाईल अशी खात्री दिली गेली तर तो भारतात परतण्यास तयार आहे का? ज्यावर त्याने उत्तर दिलं की, “जर मला खात्री दिली गेली तर मी त्याबद्दल गांभीर्याने विचार करेन.”
माल्या पुढे म्हणाला की, “पण तुम्हाला हे माहिती असायला हवे की आणखी काही लोक देखील आहेत, ज्यांना भारत सरकार ब्रिटनहून प्रत्यार्पण करण्यासाठी लक्ष्य करत आहे. त्यांच्या अपिलावर हायकोर्टाकडून निर्णय आला आहे की भारताच्या ताब्यात घेण्याच्या अटी (Indian Detention Conditions) या युरोपीयन कन्व्हेशन ऑन ह्युमन राइट्स (ECHR) च्या आर्टिकल ३ चे उल्लंघन करणाऱ्या आहेत, ज्यामुळे त्यांना परत पाठवले जाऊ शकत नाही.”
भारत सोडून पाळून जाणे आणि परत न येण्यावरून ‘फरार’ म्हटले जाते, याबद्दल विचारले असता त्याने ‘फरार’ म्हणणे रास्त असल्याचे माल्या म्हणाला, मात्र त्यांना ‘चोर’ का म्हटले जाते आणि ‘चोरी’ कुठे केली असा प्रश्न देखील त्याने यावेळी विचारला. चोर म्हटले जात असल्याच्या मुद्द्यावर माल्याने प्रश्न उपस्थित केला आहे, “मार्च (२०१६) नंतर भारतात न गेल्यामुळे मला फरार म्हणा. मी पळालो नव्हतो. मी पूर्वनियोजित दौऱ्यासाठी भारतातून बाहेर पडलो होतो. खरं तर मी काही करणांमुळे परत गेलो नाही, जे मला वैध वाटतात. त्यामुळे मला फरार म्हणू इच्छित असाल, तर म्हणा. पण चोर म्हणण्याचं कारण काय… ‘चोरी’ कुठे झाली?” दरम्यान भारत सरकारकडून माल्या यांच्या या दाव्यांवर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
माल्याला मोठा झटका
या वर्षी एप्रिल महिन्यात भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांच्या एका गटाने फरार माल्याच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाईचे आदेश कायम ठेवण्यासाठी लंडन येथील न्यायालयात दाखल करण्यात आलेली अपील जिंकले आहे. हा कायदेशीर लढा खूप दिवसांपासून सुरू होता. २०१६ मध्ये भारतातून पळून गेल्यापासून मल्ल्या ब्रिटनमध्ये राहत आहे. २०१२ मध्ये त्याच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या पतनानंतर कर्ज देणारे आणि भारतीय अधिकार्यांबरोबर त्याची दीर्घ काळापासून कायदेशीर लढाई सुरू आहे.