केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या धोरणामुळे आसाम पुन्हा हिंसाचाराच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे, असा धोक्याचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला.
आसामची संस्कृती व ओळख यावर आम्ही कुणालाही हल्ला करू देणार नाही, असे सांगून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करीत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
गुवाहाटी येथील सभेत त्यांनी सांगितले, आसामच्या संस्कृती व अस्मितेवर असा हल्ला सहन केला जाणार नाही, हे भाजप नेत्यांना निक्षून सांगण्याची वेळ आली आहे. आम्ही भाजप, संघ, चड्डीवाल्यांना आसामच्या संस्कृती व अस्मितेवर आघात करू देणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नागपूरने आसाम चालवण्याचा प्रयत्न करू नये. जर ते भाषा व ईशान्येची ओळख पुसण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांनी येथील जनतेला ओळखलेले नाही, असे समजावे लागेल.
भाजप सत्तेवर आल्यास आसाममधील कष्टाने निर्माण केलेली शांतता धोक्यात येईल, असा इशारा २०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुम्हाला दिला होता याची आठवण राहुल यांनी करून दिली. ते म्हणाले, भाजप निवडमून आल्यास शांतता, बंधुभाव व विकास संपून हिंसाचार सुरू होईल हे माझे म्हणणे दुर्दैवाने खरे ठरले आहे. भाजपमुळे राज्य पुन्हा हिंसाचाराच्या खाईत जाईल अशी भीती वाटते. बंधुत्व, प्रेम, विकास ही राज्याची बलस्थाने आहेत, ती द्वेष, संताप, भेदाभेदातून निर्माण झालेली नाहीत. बऱ्याच संघर्षांनंतर आसाममध्ये शांतता निर्माण झाली होती त्याला आसाम कराराचा आधार होता. आमचा नागरिकत्व कायद्याला विरोध आहे. संसदेत आम्ही विरोधच केला. सुरुवातीला आसाममध्ये हिंसाचार होता नंतर सगळे एक झाले. हिंसाचार संपला, अहिंसा, शांतता, विकास सुरू झाला. पण आता भाजपच्या राजवटीत हिंसाचारात पाच युवक ठार झाले. मी त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहणार आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शांततेने निदर्शने करणाऱ्या युवकांवर गोळीबार करण्याचा अधिकार राज्य व केंद्र सरकारला कुणी दिला. जिथे भाजप आहे तिथे द्वेष, हिंसा, संघर्ष आहे. भाजपला लोकांचे ऐकायचे नाही त्यांना दडपून टाकायचे आहे. जर लोक शांततेने काही सांगू इच्छित असतील, तर त्यांना मारून टाकायचे नसते त्यांचे प्रेमाने ऐकायचे असते, याचा भाजपला विसर पडला आहे.
‘एनआरसी व एनपीआर यांचे परिणाम नोटाबंदीपेक्षा भीषण’
नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीरआर) म्हणजे नोटाबंदी-२ सारखा प्रकार आहे. पण, त्याची भीषणता नोटाबंदीपेक्षाही जास्त असणार आहे, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिला आहे. राहुल गांधी यांनी अ.भा.काँग्रेस समितीच्या मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकावला, त्यानंतर त्यांनी सांगितले की, एनपीआर, एनआरसी, नागरिकत्व कायदा यांचा हेतू भारतातील गरीब लोकांना ते भारतीय आहेत की नाहीत हे विचारण्याचा आहे. हा सगळा तमाशा म्हणजे नोटाबंदी २ सारखा प्रकार आहे. त्याचा नोटाबंदीपेक्षा दुप्पट परिणाम होणार आहे. पंतप्रधानांचे जे पंधरा मित्र आहेत त्यांना कुठली कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. नोटाबंदीतील सगळा पैसा या पंधरा लोकांच्या खिशात गेला आहे. यापुढेही जाईल.
राहुल गांधी हे खोटारडे असल्याचा आरोप भाजपने केला आहे त्यावर ते म्हणाले की, देशात निर्वासितांना स्थानबद्ध करण्यासाठी छावण्या आहेत. त्यांनी माझे ट्विट पाहिले असेल. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात स्थानबद्धतेसाठी छावण्या नसल्याचे म्हटले होते. पण अशी स्थानबद्धता केंद्रे असल्याची चित्रफीत आपण जारी केली आहे त्यामुळे कोण खोटारडे आहे हे आता लोकांनीच ठरवावे.