Asaduddin Owaisi on All Party Meeting : पाकिस्तानविरोधात भारताने पुकारलेल्या लढ्यासंदर्भात चर्चा करण्याकरता आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक नुकतीच संपली असून एआयएमआयएमचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसीही या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. जिहादच्या नावाखाली पाकिस्तानातील दहशतवादी भारतात दहशतवाद पसरवू इच्छितात असं ते म्हणाले. तसंच, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या लष्कर ए तय्यबा आणि द रिझेस्टन्स फ्रंटविरुद्ध जागतिक मोहीम राबवण्याचेही आवाहन त्यांनी केलं आहे. सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटून ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. यावेळी असदुद्दीन ओवेसीही उपस्थित होते. ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल मी आमच्या सशस्त्र दलांचे आणि सरकारचे कौतुक केले. मी सुचवले की आपण टीआरएफविरुद्ध आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं. अमेरिकेने टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं. फेब्रुवारीमध्ये हाफिज अब्दुर रौफने पीओकेमध्ये भाषण दिलं होतं की ते २०२५ मध्ये पूर्ण वर्षभर जिहाद करणार आहेत. ते जिहादच्या नावाखाली खून करू इच्छितात आणि दहशत पसरवू इच्छितात. पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकले पाहिजे. यूके सरकारला टीआरएफवर बंदी घालण्यास आणि पाकिस्तानवर निर्बंध घालण्यास भाग पाडले पाहिजे”, असे ओवैसी म्हणाले.
काश्मिरी जनतेचं पुनर्वसन करा
ओवेसी पुढे म्हणाले की, केंद्राकडे एक ऐतिहासिक संधी आहे आणि त्यांनी काश्मिरींचं पुनर्वसन करावं. “पुंछमध्ये अनेक नागरिक मारले गेले आणि उरीमध्ये लोकांनी आपली घरे गमावावी लागली. सरकारने त्यांना दहशतवादाचे बळी म्हणून संबोधले पाहिजे आणि त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, तसंच त्यांची घरेही बांधून दिली पाहिजे”, अशीही मागणी केली. ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की सर्वात मोठी कामगिरी म्हणजे मुरीदके आणि बहावलपूरवरील हल्ले. ही दहशतवाद्यांचे मुख्यालय म्हणून ओळखली जातात.
चीन आणि तुर्कीचाही उल्लेख
ओवेसी म्हणाले, आपण चीनकडून मोठ्याप्रमाणात निर्यात करतो. त्यामुळे आपण चीनवर दबाव आणून पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण आणू शकतो. यावेळी आम्हाला चीनवर दबाव आणण्याचा चांगली संधी आहे. तसंच, आपल्याला तुर्कीलाही समजवावं लागेल. कारण ते आपल्याच देशातील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करते. इराक आणि सीरियाही दहशतावाद्यांविरोधात कारवाई करतात. त्यामुळे आपण त्यांना विचारलं पाहिजे की ते त्यांच्या येथील दहशतवाद्यांवर कारवाई करत आहेत तर आमच्यावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?