पीटीआय, नवी दिल्ली

हरियाणा आणि महाराष्ट्रातील मतदार यादीची माहिती जाहीर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कौतुक केले. तसेच त्याची नेमकी तारीख जाहीर करावी असे आवाहन त्यांनी केले.

राहुल गांधी यांनी एका माध्यम अहवालाची छायांकित प्रत समाजमाध्यमात प्रसिद्ध केली. या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानंतर निवडणूक आयोगाने २००९ ते २०२४ पर्यंत हरियाणा आणि महाराष्ट्रातील मतदार यादीची माहिती जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. परंतु, अद्याप या वृत्ताबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

‘एक्स’वरील संदेशात राहुल गांधी यांनी या मतदारयाद्या जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करावी असे आवाहन केले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या लेखावर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया मागवली होती. परंतु विरोधी पक्षनेत्याने थेट पत्र लिहिले तरच ही संवैधानिक संस्था उत्तर देईल, असे आयोगातील सूत्रांनी रविवारी सांगितले.

‘दि इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रकाशित लेखात, राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत ‘मॅच-फिक्सिंग’ झाल्याचा आरोप केला होता. तसेच बिहार निवडणुकीबरोबरच जिथेही भाजप पराभूत होईल, तिथे असेच प्रकार होतील, असा दावा राहुल यांनी केला होता. मात्र, भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे आरोप नाकारले आहेत. तसेच निवडणूक आयोगानेही त्यांना त्यासाठी पत्र लिहायला सांगितले आहे.

आयोगाने उचललेले हे एक चांगले आणि स्वागतार्ह पाऊल असून, ही माहिती डिजिटल, तसेच वाचनीय स्वरूपात कधी सुपूर्द केली जाईल, याची नेमकी तारीख जाहीर निवडणूक आयोग जाहीर करणार आहे का? – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशांत किशोर यांचा मागणीला पाठिंबा

पाटणा : राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल उपस्थित केलेल्या शंकांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. माजी निवडणूक रणनीतीकार असलेल्या किशोर यांनी म्हटले की, काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष असून, राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने राहुल यांनी उपस्थित केलेल्या शंका दूर कराव्यात, असे आवाहन किशोर यांनी केले आहे.