पती-पत्नीमधले वाद विकोपाला गेल्यानंतर त्याचं पर्यवसान घटस्फोटामध्ये झाल्याची अनेक प्रकरणं आपण आपल्या आसपास पाहात असतो. फॅमिली कोर्टामध्ये तर अशी असंख्य प्रकरणं दिसून येतात. पण नुकतंच छत्तीसगड उच्च न्यायालयात असं एक प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं, ज्यामध्ये शुभ मुहूर्ताची वाट पाहाणारी पत्नी तब्बल १० वर्ष सासरी गेलीच नाही! शेवटी नाईलाजाने पतीने न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. न्यायालयाने देखील या प्रकरणात पत्नीला दोषी धरत पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.

“या प्रकरणात जर पत्नी कथित ‘शुभ मुहूर्ता’साठी इतकी आग्रही असेल, तर ह शुभ मुहूर्त त्यांचं वैवाहिक आयुष्य नष्ट करून ठेवेल. पतीने पत्नीला घरी आणण्याचा दोन वेळा प्रयत्न देखील केला. मात्र, त्यालाही पत्नीने नकारच दिला”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

नेमकं झालं काय?

या प्रकरणातील पती-पत्नीचं लग्न ८ जुलै २०१० रोजी झालं होतं. पण लग्न झाल्यानंतर ११व्या दिवशीच पत्नी काहीतरी निमित्त काढून माहेरी निघून गेली. त्या वर्षी पतीने दोनदा पत्नीला परत आणण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. पण ‘आत्ता शुभ मुहूर्त नाही’, असं म्हणत पत्नीने परत येणं टाळलं. त्यानंतर देखील कधीच पत्नीने परत घरी येण्याची इच्छा दर्शवली नाही. यासंदर्भात पतीने मध्यंतरी कौटुंबिक लवादाकडे देखील याचिका दाखल केली होती. मात्र, लवादाने त्याची याचिका फेटाळून लावली.

शेवटी पतीनं थेट छत्तीसगड उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देत त्यांना घटस्फोट मंजूर केला.

“पती आणि पत्नी या दोघांच्या भूमिकांवरून हे स्पष्ट आहे की शुभ मुहूर्ताच्या कारणामुळेच पती-पत्नी एकत्र राहू शकत नाहीत. १९ जुलै २०१० पासून गेल्या ११ वर्षांपासून हे दोघे एकत्र राहात नाहीत. शुभ मुहूर्त सुखी कौटुंबिक जीवनासाठी असतो. पण या प्रकरणात असं दिसतंय की शुभ मुहूर्ताचा वापर पत्नीने पतीसोबत न राहण्यासाठी केला आहे”, असं म्हणत न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.

पत्नी म्हणते, शुभ मुहूर्तावर पती आलाच नाही!

दरम्यान, या प्रकरणातील पत्नीने देखील आपली बाजू मांडली आहे. “मी पतीसोबत सासरी जाण्यासाठी तयार होते. पण शुभ मुहूर्त सुरू झाला असताना पती आपल्याला घेऊन जायला आलाच नाही. आमच्या परंपरेनुसार हे आवश्यक होतं. मी पतीला सोडलेलं नाही. पण मला परंपरेनुसार घेऊन जाण्यात ते अपयशी ठरले”, असा दावा पत्नीने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं माहिती असून देखील पत्नीने याविषयी कोणतीही हालचाल केली नाही, याचा अर्थ पत्नीला पतीसोबत राहण्याची कोणतीही इच्छा नाही, असं म्हणत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे.