एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी शपथविधी सोहळ्याचं पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलं. त्यामुळे रविवारी ९ जून रोजी नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. आज दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करणार का?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मोदी मोदी नामगजरापासून नितीन गडकरी अलिप्त; सोशल मीडियावर कौतुक, व्हायरल व्हिडीओतील सत्य काय?

यासंददर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर राहुल गांधींकडे विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे

नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपधविधीच्या एक दिवस आधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. या बैठकीत आगामी रणनिती ठरण्याबाबात विचारमंथन सुरु आहे. १८ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासह लोकसभा निवडणुकीत निवडणून आलेल्या जागा आणि पराभव झालेल्या जागांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राहुल गांधी यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी सूचवले असल्याची माहितीही सांगण्यात येत आहे. त्यांच्या या मागणीला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये तामिळनाडूतील खासदार मणिकम टागोर यांनीही त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, “आमची इच्छा १४० कोटी लोकांच्या मागणीसारखीच असून राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं”, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता यावर राहुल गांधी काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.