ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरुन विरोधी पक्षाच्या १२ खासदारांचे संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे पाच, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन खासदeरांचा समावेश आहे.

सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. कारवाईचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. निलंबित खासदारांमध्ये सर्वाधिक म्हणजेच अर्धे खासदार हे काँग्रसचे आहेत. त्याचप्रमाणे सीपीएम, तृणमूल आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे एकूण १२ खासदार निलंबित करण्यात आले आहेत.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळेंसहीत महिला खासदारांसोबत थरुर यांनी शेअर केलल्या फोटोची कॅप्शन चर्चेत; म्हणाले, “कोण म्हणतं लोकसभा…”

राज्यसभेच्या २५४ व्या अधिवेशनामध्ये म्हणजेच ११ ऑगस्ट २०२१ च्या दिवशी झालेल्या मान्सून सत्राच्या वेळेस या सर्व खासदारांनी सभागृहाची प्रतिमा मलिन होईल अशी वर्तवणूक केलीय. त्यामुळेच राज्यसभेच्या सदस्यांच्या वर्तवणूकीसंदर्भातील नियमांमधील नियम क्रमांक २५६ नुसार १२ खासदारांचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे, अशी माहिती देण्यात आलीय.

निलंबित खासादारांची यादी खालीलप्रमाणे-
एल्लामारम करीम (सीपीएम)
फुलो देव निताम (काँग्रेस)
छाया वर्मा (काँग्रेस)
रिपून बोरा (काँग्रेस)
बिनोय विश्मव (सीपीआय)
राजमणी पटेल (काँग्रेस)
डोला सेन (तृणमूल काँग्रेस)
शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस)
सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस)
प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)
अनिल देसाई (शिवसेना)
अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)