देशातील जनतेने भाजपला सरकार चालवण्याची जबाबदारी दिली असली तरी संसदेतील सर्वच पक्षाच्य सदस्यांवर देश चालवण्याची जबाबदारी आहे, त्यामुळे शांतपणे विचार करून देशहिताचं काम करणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मागील सत्रामध्ये विरोधी पक्षाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक गोष्टी मार्गी लागल्या होत्या, त्यामुळे या सत्रातही असाच प्रतिसाद मिळेल आणि अधिवेशन शांततेत पार पडेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संसदकोंडीची गोष्ट सुरू? काळ्या पैशावरून सरकारला घेरण्याची रणनिती 

अधिवेशनाच्या सुरूवातील नरेंद्र मोदींनी सर्व नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. दिवंगत माजी सदस्यांना संसदेत श्रध्दांजली वाहण्यात आली. आज पहाटे निधन झालेल्या माजी पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे माजी खासदार मुरली देवरा यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली. नवनिर्वाचित खासदार प्रीतम मुंडे यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली.

दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.२३ डिसेंबपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असून या अधिवेशनात सरकारतर्फे विविध ३७ विधेयके संसदेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवली जाणार आहेत.