विश्वचषक स्पर्धेत आपल्या संथ खेळीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर प्रचंड टीका होत आहे. इंग्लंडविऱोधातील सामन्यातही धोनीने धीम्या गतीने धावा केल्याने त्याच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. टीका करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांचाही समावेश असून संघ व्यवस्थापनाने धोनीला बॉल फुकट घालवू नको अशी समज देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जितके चेंडू खेळतो, किमान तितक्या धावा तरी धोनीने केल्या पाहिजेत असं संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
जर संघाची अवस्था १२ धावांवर दोन विकेट्स अशी असेल तर मी धोनीला समजू शकतो. पण जर एखादा खेळाडू २० ओव्हर्सनंतर खेळायला आला असेल तर त्याने प्रत्येक चेंडूवर धाव काढली पाहिजे असं मला वाटतं असं संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
‘माझी इच्छा आहे की, संघ व्यवस्थापनाने धोनीला प्रत्येक चेंडूवर धावा काढण्यास सांगावं, त्यानंतर काय निकाल येतो ते पहायला हवं. जेव्हा धोनी वॉर्म अप सामन्यांमध्ये खेळतो तेव्हा मला प्रचंड आवडतो. जेव्हा तो ३० चेंडूत ३० धावा करतो तेव्हा मला आवडतं. जर संघाची अवस्था १२ धावांवर दोन गडी बाद असेल तर त्याचा बचावात्मक खेळीचा दृष्टीकोन समजू शकतो. पण जेव्हा २० ते २२ ओव्हर्स झाल्या असतील तेव्हा त्याने प्रत्येक चेंडूवर धाव काढणं गरजेचं आहे’, असं संजय मांजरेकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान दुखापतीमुळे विजय शंकर संघाबाहेर गेल्याचं दुख: असून मयांक अग्रवालला संधी मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया संजय मांजरेकर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय संघाची बाजू बलाढ्य असून बांगलादेशचा पराभव केला पाहिजे असं मत व्यक्त केलं. २ जुलै रोजी भारत आणि बांगलादेश संघ एकमेकांशी भिडणार आहेत.