भारतीय वायूदलाचं AN-32 हे विमान जवळपास सात वर्षांपूर्वी सर्वच रडारवरून गायब झालं होतं. या विमानाचा शोध घेण्यासाठी तेव्हा जवळपास २८ जहाज आणि एक मोठी पाणबुडी काम करत होते. पण या विमानाचा काहीच थांगपत्ता लागला नाही. पण अखेर सात वर्षांनंतर या विमानाचे अवशेष चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल ३०० किलोमीटर आत समुद्राच्या अगदी तळाशी सापडले आहेत. ही भारताच्या सर्वात मोठ्या ठरलेल्या शोधमोहिमांपैकी एक मानली जाते. पण तेव्हा या शोधमोहिमेला पूर्ण अपयश आलं होतं. आता हे अवशेष सापडल्यानंतर या विमानाचा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नेमकं घडलं काय?

चेन्नईतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशियन टेक्नोलॉजी अर्थात NIOT ही संस्था समुद्रातील अनेक संशोधन प्रकल्प राबवत असते. अशाच एका अंडरवॉटर वेहिकल अर्थात एयूव्हीची चाचणी करत असताना त्यांना एएन-३२ चे काही अवशेष सापडले. नॉर्वेहून आयात करण्यात आलेली ही एयूव्ही यांनी पहिल्यांदाच चाचणी करण्याच्या हेतूने समुद्रात जवळपास ३४०० मीटरपर्यंत खोलपर्यंत नेली होती. सुरुवातीला तिधे काही धातूचे तुकडे आढळून आले. त्यावरून त्यांना वाटलं की हे एखाद्या जहाजाचे अवशेष असावेत. पण हळूहळू गोष्टींचा सविस्तर उलगडा होत गेला.

“या AUV ला सर्वात पहिली गोष्ट दिसली ती म्हणदे एक गोलाकार पत्र्याचा तुकडा, त्यावर तीन रंगांचं चिन्ह दिसत होतं. NIOT च्या लोकांनी जेव्हा पहिल्यांदा ते पाहिलं, तेव्हा त्यांना वाटलं हे एखाद्या जहादाचे अवशेष असावेत. आसपासच्या भागाचंही निरीक्षण करण्यात आलं. आणखी काही धातूचे तुकडे आढळून आले. आम्ही त्याची छायाचित्रं भारतीय नौदल व भारतीय वायूदलाला पाठवली. शेवटी वायूदलानं ते त्यांच्याच विमानाचे अवशेष असल्याची पुष्टी केली”, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन यांनी दिली.

“ही AUV काही त्या विमानाचे अवशेष शोधण्यासाठी तिथे पाठवण्यात आली नव्हती. याआधीही ही AUV अशा प्रकारच्या काही चाचण्यांसाठी समुद्रात खोलवर पाठवण्यात आली होती. पण यावेळी ती ३४०० मीटरपर्यंत खोल गेल्यानंतर हे अवशेष आढळून आले”, असंही रवीचंद्रन यांनी नमूद केलं.

काय घडलं होतं सात वर्षांपूर्वी?

२२ जुलै २०१६ रोजी भारतीय वायूदलाच्या एएन-३२ या विमानानं चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी उड्डाण केलं. पण उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच या विमानाचा सर्व रडारशी संपर्क तुटला. विमानावर २९ जण होते. विमान बेपत्ता झाल्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या संख्येनं मनुष्यबळ, नौदलाची जहाजं, पाणबुडी या सगळ्यांची मदत घेण्यात आली होती. मात्र, अनेक दिवस शोध घेतल्यानंतरही या विमानाचा पत्ता लागला नाही. अखेर आता या विमानाचे अवशेष आढळले आहेत.