राजकारणात प्रवेश करायला मी थोडा उशीरच केला. माझं चुकलंच असं काँग्रेसच्या उत्तरप्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मी राजकारणात या आधीच यायला हवं होतं हे प्रियंका गांधी यांनी मान्य केलं आहे. माणूस आपल्या चुकांमधूनच शिकतो, मीदेखील चुकले आहे. त्यातून जो अनुभव आला त्याचा उपयोग सध्या करते आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच मी आता काँग्रेसमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास तयार आहे असंही प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं. livemint.com या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका गांधी यांनी राजकारणात यायला थोडा उशीरच झाला असं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशात काय होईल असं वाटतं हे विचारलं असता प्रियंका गांधी म्हटल्या, आम्ही अनेक जागांवर सक्षम उमेदवार दिले आहेत. आमचे उमेदवारही चांगले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येकाने आपल्या परिने पूर्ण सामर्थ्यपणाला लावून ही निवडणूक लढली आहे. त्याला साजेसेच निकाल दिसतील असंही त्या म्हटल्या आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार या राज्यांबद्दलही त्यांनी मत मांडलं.
आम्हाला या राज्यांमध्ये पक्षाला उभारी आणावी लागेल असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. त्यासाठी चांगल्या आणि योग्य उमेदवारांना, कार्यकर्त्यांना पुढे आणावं लागेल. त्यामुळे काही बदल होतील आणि ते पक्षाला बळकटी आणण्यासाठी असतील असंही प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं. तसेच या तिन्ही राज्यांमध्ये आम्ही लोकसभा निवडणुकीत चांगला लढा दिला आहे असंही त्या म्हटल्या. काँग्रेसने आश्वासन दिलेली ‘NYAY’ योजना हा निवडणुकीच्या काळात महत्त्वाचा मुद्दा ठरेल असे वाटते का? असं विचारलं असता त्या म्हटल्या की, नक्कीच ही योजना महत्त्वाची आहे. ती आल्यास शेतकरी आणि गरीब वर्गाला न्याय मिळेल.