आगामी दशक युवकांचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. युवक व्यवस्थेवर विश्वास ठेवतात आणि ज्यावेळी ती योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाही, तेव्हा तिच्याबाबत प्रश्नही उपस्थित करतात, अशा शब्दांत त्यांनी युवकांचे कौतुक केले.
अराजकता आणि अव्यवस्था यांचा युवक द्वेष करतात आणि जातीयवाद, भाईभतिजावाद आणि पक्षपात या गोष्टीही त्यांना आवडत नाहीत, असे २०१९ सालातील अखेरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांच्या विरोधात ठिकठिकाणच्या विद्यापीठ परिसरांमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
‘माझ्या मते ते व्यवस्थेची (सिस्टीम) कदर करतात. इतकेच नव्हे, तर त्यांना व्यवस्थेचे अनुकरण करायचे असते. मात्र यंत्रणेने योग्य प्रतिसाद दिला नाही, तर ते अस्वस्थ होतात आणि धैर्याने यंत्रणेलाच प्रश्नही विचारतात. हा त्यांचा गुणविशेष असल्याचे मला वाटते’, असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या देशातील युवकाला कुठल्याही प्रकारची अनागोंदी आवडत नाही, हे कुणीही खात्रीने सांगू शकतो. प्रशासनाचा अभाव, जातीयवाद, पक्षपात आणि लिंगाधारित पक्षपात यांचा ते तिरस्कार करतात, याचाही मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला.
आगामी दशकात आधुनिक भारताचे निर्माण करण्यात तरुण महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा व्यक्त करताना पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले. ‘ऊर्जेने आणि उत्साहाने परिपूर्ण असलेल्या युवकांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद आहे’, हे विवेकानंदाचे वचन त्यांनी उद्धृत केले.
‘माझा असा ठाम विश्वास आहे, की हे दशक केवळ युवकांच्या विकासाचे व प्रगतीचेच राहाणार नाही, तर ते देशाच्या विकासाचेही ठरेल. ही पिढी भारताचे आधुनिकीकरण करण्यात मोठी भूमिका बजावेल, असे मला नि:संशयपणे वाटते’, असेही मोदी यांनी सांगितले.
युवकांनी आपल्यावरील या जबाबदारीचा विचार करावा आणि १२ जानेवारीला येणाऱ्या स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी तसा संकल्प करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधान गुवाहाटीत आल्यास तीव्र निदर्शनांचा इशारा
गुवाहाटी : सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्धचे आंदोलन तीव्र करताना; ‘खेलो इंडिया’ या खेळांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० जानेवारीला गुवाहाटीत आल्यास ‘व्यापक निदर्शने’ करण्यात येतील, असे अखिल आसाम विद्यार्थी संघटनेने (आसू) रविवारी सांगितले. गुवाहाटीत ५ जानेवारीला भारत व श्रीलंका यांच्यात होणारा क्रिकेटचा टी-२० सामना आणि १० ते २२ जानेवारी २०२० या कालावधीत होणारे ‘खेलो इंडिया’ खेळ यांवर संघटना ‘बारकाईने लक्ष’ ठेवून आहे, असे आसूच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.