पृथ्वीवर २४ तासांतून एकदा सूर्य उगवतो आणि मावळतोही. ही प्रक्रिया सुरूच राहते आणि आपण ती लहानपणापासून पाहत आलो असल्याने आपल्याला त्यात काही नवीन वाटत नाही. मात्र, सूर्य हेच पृथ्वीवरील सर्वांत मोठे केंद्र आहे. याच सूर्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. आपण अनेकदा लोकांना बोलताना पाहिले आहे की, आज काय सूर्य पश्चिमेला उगवलाय? पण आपल्याला माहीत असते की, तो पूर्वेकडूनच उगवतो. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की खरेच जर सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेला उगवला, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील? चला तर आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ. सूर्य पश्चिमेकडून उगवल्यावर काय होईल? विज्ञानानुसार, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरू लागेल. आणि असे झाल्यास त्याचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे जोरात वारा वाहणे आणि समुद्रात त्सुनामीची तीव्र परिस्थिती निर्माण होणे. पृथ्वीवरही गंभीर बदल झाल्याचे दिसून येतील. उदाहरणार्थ, आज दक्षिण अमेरिकेत दिसणारी हिरवीगार जंगले वाळवंटात बदलतील. समुद्राच्या लाटांच्या दिशा बदलतील आणि वारे विरुद्ध दिशेने वाहू लागतील. वाळवंटे जंगलात बदलतील असे झाले, तर काही वर्षांत पृथ्वीवरील वाळवंट हिरव्यागार वन क्षेत्रासारखे बनण्याची शक्यता आहे. किंबहुना जेव्हा वाऱ्यांमध्ये बदल होईल, तेव्हा तापमानातही बदल होईल. म्हणजेच जे भाग आज खूप थंड आहेत, ते उष्ण होतील आणि जे भाग आज खूप उष्ण आहेत, ते खूप थंड होतील. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जगातील किनारी भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि काही जीव कायमचे नामशेषही होऊ शकतात. हेही वाचा >> ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती…मंडळी ‘खेडेगाव’ या शब्दाचा खरा अर्थ माहितीये का? जाणून घ्या अनेक पिकेसुद्धा नाहीशी होऊ शकतात. स्पष्टपणे सांगायचे झाले तर, असे झाल्यास संपूर्ण पृथ्वीवरच याचे वेगवेगळे परिणाम होतील. त्याशिवाय त्याचा परिणाम माणसांच्या दिसण्यावरही होऊ शकतो. म्हणजेच असे झाले, तर काही वर्षांत अमेरिका, युरोप व आफ्रिकेतील लोकांचा रंग बदलू शकतो. दरम्यान, काळजी करण्याची गरज नाही. कारण- जोपर्यंत एक प्रचंड उल्का पृथ्वीवर आदळत नाही आणि तिची कक्षा पूर्णपणे विस्कळित करीत नाही तोपर्यंत पृथ्वी दिशा बदलण्याची शक्यता नाही, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.