Indian Railway:  रेल्वे हे भारतातील वाहतुकीचे सर्वाधिक पसंतीचे साधन मानले जाते. भारतातील सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. यामुळे भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशातील जवळपास प्रत्येक मोठे शहर या रेल्वे नेटवर्कने जोडलेले आहे. यात प्रवाशांच्या गरजा आणि सोयी लक्षात घेऊन रेल्वेकडून वेगवेगळ्या कॅटेगरीचे तिकिट पुरवले जाते. यात फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल क्लासची तिकिटे उपलब्ध आहेत. यातील जनरल तिकिटाची किंमत सर्वात कमी आहे. पण जनरल तिकीट किती तास वॅलिड आहे याची माहिती बहुतांश रेल्वे प्रवाशांना नसते. पण नियमांची माहिती नसल्याने अनेक प्रवासी अडचणीत येतात आणि तिकीट काढल्यानंतरही त्यांना दंड भरावा लागतो.

जर तुम्हाला वाटत असेल की, जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही ट्रेनमध्ये चढू शकता, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण रेल्वेचे तिकीट खरेदी केल्यानंतर ट्रेन पकडण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. रेल्वे तिकीट नियमांनुसार, जर एखाद्या प्रवाशाला १९९ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर, प्रवाशाने जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर ३ तासांच्या आत ट्रेनमध्ये चढावे लागते. तसेच २०० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरासाठी जनरल तिकिट ३ दिवस अगोदर खरेदी करता येतील. जर एखाद्या प्रवाशाने १९९ किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी केले, तर त्याला त्याच्या गंतव्य स्थानकावर जाणारी पहिली ट्रेन सुटण्यापूर्वी किंवा तिकीट खरेदी केल्यानंतर ३ तासांच्या आत प्रवास सुरू करावा लागेल.

2016 मध्ये रेल्वेने जनरल तिकिटांसाठी कालमर्यादा निश्चित केली होती. पण आता १९९ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी खरेदी केलेल्या तिकिटावर तीन तासांनंतर प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करताना आढळल्यास, त्याला विना तिकीट प्रवास करणारा प्रवासी मानत त्याच्याकडून नियमानुसार दंड आकारला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१६ पूर्वी जनरल तिकिटांवर प्रवासासाठी कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नव्हती. याचा फायदा काही प्रवासी घेत होते. देशातील काही मोठ्या स्थानकांवर काही टोळ्या प्रवास पूर्ण केलेल्या प्रवाशांकडून जनरल तिकीट घेऊन ते पुन्हा कमी किमतीत प्रवाशांना विकत होते. त्यामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान होत होते. हे थांबवण्यासाठी रेल्वेने जनरल तिकिटांवर प्रवास करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे.