Dry day on Gandhi Jayanti: २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती, या दिवशी संपूर्ण भारतभर ड्राय डे पाळला जातो. जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना सरकारनेही राष्ट्रपिता या संकल्पनेची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते. म्हणूनच २ ऑक्टोबर रोजी बार, हॉटेल्स, दारूची दुकाने, घाऊक विक्रेते आणि कॅसिनोसह दारूचा परवाना असलेल्या सर्व ठिकाणी दारू विक्री करण्यास संपूर्ण देशभरात मनाई असते. गेली अनेक दशके गांधी जयंतीच्या दिवशी ड्राय डे पाळला जातो.

ड्राय डे म्हणजे काय?

ड्राय डे म्हणजे या दिवशी दारूच्या विक्रीवर बंदी असते. मद्यविक्री हा त्या त्या राज्यांचा स्वातंत्र विषय असल्याने देशभरात दारूबंदीचे कायदे वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली सरकारने प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती आणि स्वातंत्र्य दिन या तीनही राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी दारू विक्रीवर बंदी घातली आहे. याशिवाय राजधानीत इतरही महत्त्वाचे धार्मिक दिवस ड्राय डे म्हणून सूचीबद्ध केले जातात. दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानुसार (the Excise Department), यामध्ये राम नवमी, गुरु रविदास जयंती, होळी इत्यादींचा समावेश आहे.

अधिक वाचा: Mound of the Dead: मोहेंजोदारोला ‘मृतांची टेकडी’ असे का म्हणतात?

भारतात कुठल्या राज्यांमध्ये दारू विक्रीला बंदी आहे?

गुजरात आणि बिहार यांच्या अधिकारक्षेत्रात दारू विक्रीवर पूर्ण बंदी संपूर्ण राज्यात लागू आहे. याउलट हरियाणा हे एकमेव राज्य आहे, तिथे फक्त एकच ड्राय डे आहे. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी हरियाणा सरकारने संध्याकाळी ५ नंतर दारू विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, गांधी जयंतीला राज्यात संपूर्ण दिवस दारूबंदी आहे. गुजरातमध्ये १९६० पासून दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बिहारमध्ये २०१६ साली दारू विक्रीवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली होती आणि ती कायम आहे. मिझोराम देखील ड्राय डे राज्यांच्या पंक्तीत सामील झाले आहे. मिझोराम राज्य सरकारने २०१९ साली दारू विक्रीवर बंदी घातली. ईशान्येतील नागालँडमध्येही १९८९ पासून दारू विक्रीवर बंदी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गांधी जयंतीला ड्राय डे का पाळला जातो? Why is a Dry Day observed on Gandhi Jayanti?

गांधी जयंतीच्या दिवशी मद्यपानावर बंदी घालण्यात आली आहे. महात्मा गांधींचा दारूला विरोध होता. त्यांनी म्हटले होते, “दारू आणि मादक पदार्थांचे व्यसन हे अनेक बाबतीत मलेरियासारख्या रोगांपेक्षा अनंत पटीने वाईट आहे; कारण मलेरियासारखे आजार फक्त शरीराचे नुकसान करतात, परंतु व्यसन शरीर आणि आत्मा दोन्ही नष्ट करते.” १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, राज्य धोरणाच्या निर्देश तत्वांमध्ये (DPSP-Directive Principles of State Policy) मद्यनिर्बंधाचा समावेश करण्यात आला. ही धोरणे कायद्याने अंमलात येण्याजोगी नसली, तरी देशासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून कार्य करतात.