औरंगाबाद म्हणजे ऐतिहासिक ठिकाणांची राजधानी आणी तिथेच मी राहतो . माझ्याकडे पल्सर १५०आहे . मला भटकंती करायचा नाद लागला तो बाइकमुळेच. औरंगाबादेत आमचा एक ग्रुप आहे. आम्ही सर्व मित्र भटकंती करायला जायचो, रविवार निश्चित असायचा. सर्वजण सकाळी बाबा पेट्रोल पंपाजवळ जमायचो आणि कुठे जायचं ते ठरवायचो. मग सुरू व्हायची रेसची धूम. जो कोणी अगोदर दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर पोहोचेल त्याला रात्रीचे जेवण मोफत, अर्थात सर्वांनी काँट्रिब्युशन काढून, असं ठरलेलं असायचं. दुसरा थांबा खुलताबादला. तिथे भद्रा मारुतीचे दर्शन घेतले की आमची स्वारी निघायची  आमच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे म्हैसमाळला. तिथे थांबून मग सायंकाळी सहाच्या सुमारास परतीची वाट धरायचो. परतीच्या वाटेवर मात्र एकच थांबा आणि तो म्हणजे फौजी ढाबा. तिथे आमचं रात्रीच जेवण असायचं . नंतरचा रविवारी आमचं भटकंतीचं ठिकाण असायचं वेरूळ . अगोदर आम्ही जायचो घृणेश्वरला ज्योतिर्लिगाचं दर्शन घेऊन लवकरच वेरूळ पोहोचायचो. कारण लेण्या बघण्यासाठी पूर्ण दिवस लागायचा मग काय दिवसभर लेण्यामध्येच फिरायचो . असेच आम्ही पठण , गौताळा असे  बऱ्याच ठिकाणी भटकंती आम्ही केली . या सर्व भटकंती मध्ये माझ्या बाइकने मला कुठेच धोका दिला नाही हे महत्वाचे. खूप वेळा मित्राची बाइक पंक्चर होणे तर कधी पेट्रोल संपणे अशा अडचणी उद्भवायच्या. आताही आम्ही दर रविवारी फिरायला जातो . फक्त फरक इतकाच की रेसची धूम थांबली आहे कारण काही महिन्यांपूर्वी आमचा मित्र बाइक अपघातात मरण पावला. आता आम्ही बाइक अतिवेगाने चालवण्याचा मोह टाळला पण आम्ही हे अगोदर करू शकलो असतो तर कदाचित मित्राचे प्राण वाचले असते असे वाटते.
श्रीकांत जगताप, औरंगाबाद

मी बाइकवेडा..
तुम्ही फक्त एवढंच करा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवा. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com