लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी असताना फेसबुकने काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस हटवले आहेत. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, अग्राह्य मजकूरप्रकरणी देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाशी संबंधित ही पेजेस बंद करण्यात आली आहेत. फेसबुकने अशा पद्धतीने एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित पेजेसवर कारवाई करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. फेसबुकने कारवाईसंबंधी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, खोट्या बातम्यांसाठी ही कारवाई करण्यात आली नसून अग्राह्य मजकूरप्रकरणी ही कारवाई कऱण्यात आली आहे.

भारतात सर्वात जास्त 30 कोटी फेसबुक युजर्स आहेत. फेसबुकने सांगितलं आहे की, लोकांनी बनावट अकाऊंट्स तयार केली आणि नंतर वेगवेगळ्या ग्रुप्सना जोडून मजकूर पसरवला आणि लोकांमध्ये संपर्क वाढवण्याचं काम केलं असं तपासात निष्पन्न झालं आहे. या बनावट पेजेसवर स्थानिक बातमी व्यतिरिक्त भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जात होती असंही फेसबुकने सांगितलं आहे.

दरम्यान काँग्रेसने यावर स्पष्टीकरण देताना खरंच ही पेजेस काँग्रेसशी संबंधित होती का याची पाहणी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. यासोबत या बातमी काही तथ्य आहे का तेदेखील तपासणं गरजेचं असल्याचं काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी सांगितलं आहे. फेसबुकचे सायबर सेक्युरिटी पॉलिसी हेड नॅथनिएल ग्लेचियर यांनी सांगितलं आहे की, ‘लोकांनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, पण तपास केला असता हे पेजेस काँग्रेसच्या आयटी सेलमधील लोकांशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं’.

भारतात 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर 23 मे ला निकाल जाहीर होणार आहे. उदाहरण म्हणून फेसबुकने हटवण्यात आलेली दोन पेजेस दाखवली आहेत ज्यामध्ये नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती, तर काँग्रेस आणि राहुल गांधींना समर्थन देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

पाकिस्तानी लष्कराशी संबंधित 103 पेजेस हटवण्यात आली
फेसबुकने पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाशी संबंधित 103 पेजेस हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व पेजेस पाकिस्तानातूनच ऑपरेट केली जात होती.