भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन स्वामी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने काही दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला असला या प्रकरणात राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

राहुल गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लि.’ या कंपनीच्या कागदपत्रांवर ब्रिटनचा नागरिक असल्याचे म्हटल्याचा आरोप आहे. भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी केंद्राने राहुल यांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रारही दाखल केली होती.  मंगळवारी गृहमंत्रालयाने या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर राहुल गांधी काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.