प्रियंका गांधी वढेरा यांना गेल्या पाच वर्षात माझं नाव माहिती नव्हतं. मात्र, आता ते सातत्याने माझ्या नावाचा जप करीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींना टोला लगावला आहे. अमेठीत माध्यमांशी त्या बोलत होत्या.


इराणी म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात माझं नाव माहिती नसलेल्या प्रियंका गांधी आता सातत्याने माझं नाव उच्चारत आहेत. सध्या त्या आपल्या पतीचे नाव कमी आणि माझंच नाव जास्त उच्चारत आहेत. यावरुन माझा अमेठीतला प्रचार यशस्वी झाला असल्याचीच ही पावती आहे.

दरम्यान, अमेठीतील एका घटनेचा दाखला देताना इराणींनी गांधी कुटुंबावर कठोर शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. या रुग्णाकडे आयुष्यमान भारतचे कार्ड असल्याने त्याला उपचार नाकारण्यात आले आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा दावा यावेळी त्यांनी केला.

यावरुन गांधी कुटुंब किती वाईट आहे, हे लक्षात येतं. त्यांना केवळ राजकारण प्रिय असल्याने त्यांनी एका निर्दोष व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत ढकलून दिलं, असा खळबळजनक आरोपही यावेळी स्मृती इराणी यांनी केला.