गिरीश बापट यांचा इशारा

तूरडाळ खरेदीसह अन्य कोणत्याही प्रकरणात माझ्यावर भ्रष्टाचाराचे वैयक्तिक आरोप झालेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी आरोप करताना भान ठेवणे आवश्यक आहे, असा इशारा पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांनी बुधवारी विरोधकांना दिला. विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांकडे मी लक्ष देत नाही आणि लोकसभा निवडणूक सोपी आहे, असे समजत नाही. तरीही सर्व सहा विधानसभा मतदार संघात भाजपला मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देऊन संपादकीय विभागाबरोबर चर्चा केली. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत बधे या वेळी उपस्थित होते. शिवसेनेबरोबर झालेल्या युतीचा फायदा होणार आहे, असे सांगून बापट म्हणाले,की पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामे सुरू झाली असून विकास कामांना गती देण्याबरोबरच राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शहराच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.

पुण्यासारख्या शहरांचा केंद्र आणि राज्य शासनाशी कायम संबंध येतो. विमानतळ, मेट्रो, वर्तुळाकार मार्ग, स्मार्ट सिटी या सारख्या योजनांना भाजपच्या सत्तेच्या काळात चालना देण्यात आली. स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होत आहे. नदी सुधार योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. हे सर्व प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. सरकारकडून लोकांना मोठय़ा अपेक्षा आहेत. मात्र सत्ता आली की लगेच बदल होत नसतात. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी किंवा प्रकल्प, योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, असेही बापट यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली आहे. विकासकामे करताना संघटनात्मक बांधणीही मजबूत करण्यात आलेली आहे. निवडणुकीत व्यक्तिगत आरोप करायचे नाहीत असे मी ठरविले आहे, असे सांगून बापट म्हणाले, विरोधकांचे काम सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे असते. या काळात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांकडे मी लक्ष देणार नाही. निवडणुकीत सर्व सहाही विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळेल, असा मला विश्वास आहे. शिवसेनेबरोबर यापूर्वी युती होती. त्यानंतर स्वबळावर निवडणुका लढण्यात आल्या. युतीमध्ये असताना काही मतभेद होते. मात्र हे सर्व विसरून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात उतरले आहेत.