नोकरीच्या जाहिरातीत ‘मराठी नॉट वेलकम’ असं म्हणणाऱ्या गिरगावातील कंपनीविरोधात, तसेच मराठी उमेदवाराला प्रचार करण्यापासून रोखणाऱ्या घाटकोपरमधील एका सोसायटीविरोधात वातावरण तापलेलं असताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसाठी आवाज उठवला होता. रेणुका शहाणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांना मत देऊ नका असं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वाघ यांनी शहाणे यांना एक पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत.

मुंबईच्या गिरगावातील एका कंपनीने नोकरीसंदर्भातली जाहिरात देताना त्यात ‘मराठी नॉट वेलकम’ असं म्हटलं होतं. तर घाटकोपरच्या एका गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या गुजराती रहिवाशांनी मराठी लोकांना प्रवेश नाकारल्याची, मराठी उमेदवाराला प्रचार करण्यापासून रोखल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांवर भाष्य करत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, “मराठी “not welcome” म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.”

रेणुका शहाणे यांच्या या पोस्टवर चित्रा वाघ यांनी यावर नाराजी व्यक्त करत शहाणे यांना एक पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. चित्रा वाघ यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की, आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करवले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान आणि कौतुकच आहे. भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणीव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तिचा मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आपण ट्वीटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो.

“जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये तुम्ही स्वःत खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीनुसार त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच. परंतु, तिचा वापर फक्त राजकीय हेतुकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे.”

हे ही वाचा >> “मोदींचे पहिल्यांदाच अदाणी, अंबानींवर थेट आरोप, ईडीने आता कारवाई करावी”, संजय राऊतांची मागणी

“आपणास एक प्रश्न विचारते की कोव्हिडमध्ये पीपीई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला पण मुंबई महापालिकेच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना कुलूप लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्सर मौन बाळगणार का?”