गोवा विधानसभेसाठी येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असताना आज आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनी गोव्याचं पर्यावरण सांभाळून गोव्याचा विकास कसा साध्य करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी गोव्यात राजकीय पक्षांकडून देण्यात आलेल्या उमेदवारीमध्ये घराणेशाही दिसून आल्याचा मुद्दा उपस्थित होताच आदित्य ठाकरेंनी त्यावर देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“घराणेशाहीविषयी जेव्हा आपण बोलतो…”

एखाद्या व्यक्तीला उमेदवारी देताना कोणत्या गोष्टी पाहायला हव्यात, याविषयी आदित्य ठाकरे यांनी भूमिक मांडली आहे. “घराणेशाहीविषयी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा एकच बघायला हवं, की त्या व्यक्तीला काम करण्याची आवड आहे का? खरंच त्यानं काम केलं आहे का? किती वर्ष काम केलं आहे? ते लोकांसोबत कसे वागतात? त्यांचं कर्तृत्व काय आहे हे बघायला हवं. अर्थात एकमेकांवर हे टीका करत आहेत. पण लोकांना माहिती आहे की काय करायचं आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

भाजपाला खोचक सवाल

दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंनी गोव्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला खोचक शब्दांत सवाल केला आहे. गोव्यात शिवसेना ११ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र, शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त होईल, अशी टीका भाजपाकडून केली जात असताना त्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“…मग आमच्यावर टीका का करताय? तुम्हाला कसली भिती आहे?” आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर कुणाला आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, आमचे डिपॉझिट जप्त होणार असं वाटत असेल, तर मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता तरी का? भिती कसली वाटतेय? होऊ दे प्रचार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.