Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगडचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांना आपल्या शैलीत रोखठेक उत्तरे दिली. छत्तीसगडमध्ये ७ व १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत निवडणुका होत आहेत. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागेल. छत्तीसगडची निर्मिती झाल्यापासून राज्यात भाजपाची सत्ता होती. २०१८ साली काँग्रेसने भाजपाची सत्ता उलथवून लावत विजय मिळवला. भूपेश बघेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. मागच्या पाच वर्षांत भाजपाने बघेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. तर, मुख्यमंत्री बघेल आपले शासन शेतकऱ्यांसाठी समर्पित असल्याचे सांगतात. द इंडियन एक्स्प्रेसच्या ज्येष्ठ राजकीय पत्रकार नीरजा चौधरी यांनी भूपेश बघेल यांची मुलाखत घेतली असून, ती प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात खालीलप्रमाणे :

प्रश्न : काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार का जाहीर केला नाही?

भूपेश बघेल : तुम्ही चुकीच्या व्यक्तीला हा प्रश्न विचारत आहात. हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना विचारायला हवा. मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार घोषित करणं त्यांच्या हातात आहे. तरी पक्षाचे सरचिटणीस व छत्तीसगडचे प्रभारी (कुमारी शैलजा) यांनी याआधीच जाहीर केलं आहे की, निवडणुका मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील.

हे वाचा >> Chhattisgarh Election : मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह काँग्रेसच्या ‘या’ चार नेत्यांच्या कामगिरीकडे काँग्रेसचे लक्ष

प्रश्न : मग पक्षानं तुमचं नाव उघडपणे जाहीर का नाही केलं?

भूपेश बघेल : या प्रश्नाचं उत्तर पक्षश्रेष्ठीच देऊ शकतील. याचं उत्तर माझ्याकडे नाही. मागच्या पाच वर्षांत मी या राज्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जर मला पुन्हा संधी मिळाली, तर त्याच प्रकारे आणखी पाच वर्षं मेहनत करण्याची माझी तयारी आहे.

प्रश्न : तुमचं सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलं, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. जसं की, मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, मद्य, बेटिंग घोटाळा इत्यादी.

भूपेश बघेल : २०२० साली प्राप्तिकर विभागानं अनेक ठिकाणी (मुख्यमंत्री बघेल यांचे निकटवर्तीय) धाडी घातल्या. ते जे आरोप करीत होते, त्याबद्दल त्यांना काहीही आढळलं नाही. त्यानंतर मग ईडीचीही छापेमारी झाली. आता सीबीआयही यात उतरली आहे. मागच्या तीन वर्षांपासून ते विविध यंत्रणांना पुढे करून तपास करीत आहेत. आता त्यांनी थेट इंटरपोलला चौकशीसाठी बोलवावं; काय हरकत आहे?

माझ्या सरकारनं महादेव बेटिंग ॲप प्रकरणात चौकशी केली; पण त्याच वेळी केंद्र सरकार सट्टेबाजांवर (बेटिंग) निर्बंध का घालत नाही? अनेक राज्यांनी अशा ॲपवर जीएसटी लावण्यास सुरुवात केली आहे. मद्य घोटाळ्याच्या विषयात बोलायचं झाल्यास, दिल्लीत अबकारी धोरण बदललं गेलं; पण आम्ही इथं कोणतंही धोरण बदललं नाही. आम्ही रमण सिंह यांचंच धोरण पुढे राबविलं आहे.

आता ५५० कोटींच्या कथित कोळसा घोटाळ्याबाबत बोलू. छत्तीसगडमध्ये फक्त एक किंवा दोन खासगी खाणी आहेत. बाकीच्या सर्व खाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. जर या ठिकाणाहून कोळशाची चोरी झाली असेल, तर मग केंद्र सरकारनं एसईसीएलच्या (South Eastern Coalfields Ltd.) अधिकाऱ्यांना या ठिकाणी चौकशीसाठी का नाही पाचारण केलं? अटकेचं तर सोडूनच द्या; पण साधी चौकशीही नाही. दोन महिन्यांपूर्वी एसईसीएलने रायगडमधील एक कोळसा खाण अदाणीला दिली. भाजपाचे लोक मला फासावर लटकवण्याची धमकी देत आहेत. पण, अदाणी आणि खाणींच्या विक्रीमध्ये भूपेश बघेल उभा आहे. ही लढाई छत्तीसगडला विकणारे आणि छत्तीसगडला वाचविणारे यांच्यामध्ये आहे.

प्रश्न : राज्यात होणारं धर्मांतर रोखण्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही, असाही आरोप केला जातोय.

भूपेश बघेल : माझ्या एका मंत्र्यानं आधीच जाहीर केलं आहे की, विरोधकांनी जर मागच्या पाच वर्षांतील एक तरी धर्मांतराचं प्रकरण निदर्शनास आणून दिलं, तर ते राजीनामा देऊन राजकारण सोडून देतील. भाजपाच्या काळातच राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेसचं बांधकाम झालेले आहे. मी वारंवार सांगितलं आहे की, ज्यांची आस्था आहे, ते या ठिकाणी आस्था केंद्रात आहेत.

हे वाचा >> विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांचे मोठे आश्वासन, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार!

प्रश्न : तुम्ही सौम्य हिंदुत्वाचं आचरण करता, असाही एक आरोप होतोय.

भूपेश बघेल : सौम्य आणि कडवं हिंदुत्व ही तुमची भाषा झाली. आम्ही तर छत्तीसगडची आयुष्य जगण्याची जी परंपरा आहे, त्याप्रमाणे जगत आहोत. आम्ही इतर गोष्टींप्रमाणेच छत्तीसगड ऑलिम्पिक आणि रामायण महोत्सव या ठिकाणी पार पाडत आहोत. या ठिकाणच्या प्रत्येक गावात रामायण आहे. राम छत्तीसगडचा ‘भाचा’ असल्याचं म्हटलं जातं. आम्ही फक्त गाय आणि राम यांचीच चर्चा करीत नाही. इथे मामा आपल्या भाच्यात रामाचं स्वरूप पाहून त्याच्या पाया पडतो; ही छत्तीसगडची संस्कृती आणि ओळख आहे. संत कबीर यांचाही इथे मोठा प्रभाव दिसतो; विशेषतः दुर्ग जिल्ह्यात त्यांचे अनेक अनुयायी आहेत.

प्रश्न : मागच्या वेळी तुम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वांत आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. यावेळी काँग्रेसनं अनेक आश्वासनं दिली आहेत.

भूपेश बघेल : आम्ही तीन आश्वासनं आधीच जाहीर केली आहेत. राहुल गांधी रांचीच्या दौऱ्यावर असताना जातनिहाय सर्वेक्षण घोषित केलं गेलं आहे. धानाच्या खरेदीमध्ये वाढ करण्यात आली असून, आता प्रतिएकर १५ क्विंटलऐवजी २० क्विंटल धानाची खरेदी केली जाणार आहे. प्रियांका गांधी-वाड्रा जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या, तेव्हा आम्ही १७.५ लाख घरे निर्माण करणार असल्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी केंद्र सरकार निधी देवो किंवा न देवो; आम्ही घरं बांधणार आहोत.

प्रश्न : पाच वर्षांनंतर लोकांनी पुन्हा तुम्हालाच मतदान करावं, असं का वाटतं?

भूपेश बघेल : हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कारभार करीत आहोत. त्यासाठी आम्ही आमची कटिबद्धता सिद्ध केली आहे.

प्रश्न : ओबीसींची आता जोरदार चर्चा होत आहे. तुम्हीही ओबीसी प्रवर्गातून येता. त्यामुळे भविष्यातील राजकारण कोणत्या दिशेला जाईल, असं तुम्हाला वाटतं.

भूपेश बघेल : मी छत्तीसगडच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहतो. हेलिकॉप्टर किंवा उंच आकाशात उडणाऱ्या विमानातून पाहत नाही. आम्ही राज्यात जे काही केलं, ते शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून केलं आणि मला वाटतं की, समाजातील प्रत्येक घटक हा शेतकरीवर्गात मोडतो. मग तो आदिवासी असो, मागासवर्गीय जातीचा असो, उच्चवर्गीय वा अनुसूचित जातीचा असो.

प्रश्न : २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातून पंतप्रधानपदासाठी चेहरा जाहीर करावा, असं ठरलं, तर तुमच्या मते तो नेता कोण असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूपेश बघेल : माझ्या मते- राहुल गांधी. पक्षश्रेष्ठी आणि इंडिया आघाडी काय ठरविणार, हा सर्वस्वी निर्णय त्यांचाच आहे. पण, मी माझी इच्छा सांगितली. मी फक्त काँग्रेसच्या चार मुख्यमंत्र्यांपैकी एक आहे.