पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील बाडमेर-जैसलमेर या लोकसभा मतदारसंघात आज (१२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या बाडमेर-जैसलमेर मधून भाजपाने कैलाश चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. चौधरी यांच्या प्राचरासाठी स्वतः पंतप्रधानांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा, इंडिया आघाडी आणि आण्विक शस्त्रास्रांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया आघाडी आपल्या देशातील आण्विक शस्त्रास्रं नष्ट करण्याचा कट रचत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या काळात देशाच्या सीमावर्ती भागात अजिबात विकास झाला नाही. त्यांनी जाणून-बुजून विकास केला नाही, जेणेकरून आपल्या शत्रू राष्ट्रामध्ये लपून बसलेले आपले शत्रू या सगळ्याचा गैरफायदा घेऊन सहज आपल्या देशात यावेत. परंतु, भाजपा सरकारच्या काळात आपल्या शत्रूची इतकी हिंमत कधी झाली नाही. आपले शत्रू आपल्याकडे नजर उंच करून पाहू शकत नाहीत. आमच्यासाठी सीमेवरील गाव म्हणजे देशातलं शेवटचं गाव नाही तर ते देशातलं पहिलं गाव आहे. त्यामुळेच आम्ही सर्वात आधी आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामं केली.

तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की यावर मुस्लीम लीगचा प्रभाव आहे. भाजपाने आपल्या देशाला आण्विक सक्षम बनवलं. परंतु, काँग्रेस आपली ती शक्ती नष्ट करण्याच्या विचारात आहे. देशाला प्रश्न पडलाय की, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून इंडी आघाडी आपल्या देशाची आण्विक शस्त्रास्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्या देशाला कमकुवत करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. इंडिया आघाडी हे कोणाच्या सांगण्यावरून करतेय? देशाला कमकुवत कण्याचा कट रचणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी या निवडणुकीत लोकांनी भाजपाच्या बाजूने मतदान करण्याची आवश्यकता आहे.

हे ही वाचा >> संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज, भर सभेत म्हणाले…

मोदी यांनी यावेळी रिफायनरीद्वारे रोजगार उपलब्ध करण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच ते म्हणाले, काँग्रेस रिफायनरीच्या विरोधात आहे. ते रिफायनरीच्या कामात अडथळे आणत आहेत. परंतु, मी आश्वासन देतो की मी माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात स्वतः इथे येऊन रिफायनरीचं उद्घाटन करेन.