लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी संध्याकाळी ५ वाजता संपला. महाराष्ट्रातल्या ११ जागांसाठी मंगळवारी म्हणजेच ७ मे च्या दिवशी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका रविवापर्यंत दिसून आला. अशातच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ठाकरेंचा विश्वासू नेता शिवसेनेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या नेत्याने पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाशिकचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. कुठल्या नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ? नाशिकमधले ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे आणि पहाटे अडीच तीनच्या सुमारास मुंबईतल्या बाळासाहेब भवन या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसेही उपस्थित होते. विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य, “स्वतः शेणात तोंड बुडवायचं आणि दुसऱ्याच्या..” विजय करंजकर यांनी काय म्हटलं आहे? "सगळ्यांना ही गोष्ट ही माहित आहे की मी लोकसभा निवडणुकीचं तिकिट मला मिळेल. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला अतोनात प्रेम दिलं. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो. आत्ता पक्षात निराशाच निराशा आहे. कुणीही ऐरेगैरे येतात आणि चमचेगिरी करुन पक्षाचे नाईक आणि पाईक बनू पाहात आहेत. त्यामुळे या पक्षात खऱ्या शिवसैनिकांना न्याय मिळू शकत नाही अशी भावना सामान्य शिवसैनिकांची आहे. बाळासाहेब ठाकरे असताना चमचेगिरी नव्हती. तक्रार झाल्यास तक्रारीचा परामर्श घ्यायचे मग निर्णय द्यायचे. आज परिस्थिती अशी आहे की कुणीतरी चमचा येतो तो काहीतरी सांगतो आणि मग त्यावरुन कुणावर तरी कारवाई होते. तिकिट कापलं जातं. मला सांगण्यात आलं की तुम्ही सर्व्हेत दिसत नाही. संजय राऊत हे बोलले होते. पण मी सगळी तयारी केली होती. उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली. त्यांनीही मला वचन दिलं आपण बोलू. पण मला तिकिट मिळालं नाही." असं म्हणत विजय करंजकर यांनी त्यांची खंत बोलून दाखवली. हे पण वाचा- “संजय राऊत ही गेलेली केस”, पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून गुलाबराव पाटलांची खोचक टीका; म्हणाले… चमच्यांना जवळ केलं जातं आहे एक एक माणूस कमवताना काय बळ द्यावं लागतं ते आम्हाला माहीत आहे. आत्ता चमच्यांचे सल्ले पाळले जात आहेत. चमच्यांना आधार दिला जातो आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षात घाणेरडी परिस्थिती आहे. मी एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने माझ्यावर काही लोक बोलले. त्यांना मी परवा माझ्या मेळाव्यातून उत्तर देईन. असंही करंजकर यांनी म्हटलं आहे. तसंच मी कधीही कुणाकडे तडजोड करायला गेलो नाही. पक्षाची मान कशी उंचावेल यासाठीच मी मदत केली होती. मात्र गलिच्छ कामं या लोकांनी केली आहेत. मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे मला दूर करण्याचं काम झालं आहे असंही करंजकर यांनी म्हटलं आहे. आता मी हेमंत गोडसेंसाठी काम करणार आणि त्यांना १०० टक्के निवडून आणणार असंही विजय करंजकर म्हणाले.