बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले रविकांत तुपकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते प्रचार करत असताना त्यांनी प्रतापरव जाधवांवर टीका केली.

“प्रतापराव काका तुम्ही गेली १५ वर्षे खासदार आहात, पण तुम्ही केलं काय? या परिसरात एखादा प्रकल्प आणला का? पोरांना रोजगाराच्या सुविधा आणल्या? दूध डेअरी झाली? साखर कारखाना आणला? धरण तरी केलं का पंधरा वर्षांत? जे काही झालंय ते जुन्या काळातील आहे. याला म्हणतात विकास”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

हेही वाचा >> आता राजकारणातही उघड सामंजस्य करार! शेतकरी संघटनेचे ‘एमओयू’नंतर रविकांत तुपकर यांना पाठबळ

“यांनी काय केलं? यांनी फक्त १५ वर्षें दिल्लीत जाऊन तंबाखू मळली. तुमचाच तंबाखू आणि तुमचाच चुना आणि मला फक्त फुकटात निवडून आणा. एवढा धंदा केला काकांनी. सोयाबीनबद्दल प्रतापराव जाधव बोलले का? कापसाबद्दल बोलले, मुस्लिम बांध, तरुणांबद्दल बोलले, रोजगाराबद्दल बोलले. आपल्या खासदाराचं नाव विचारलं तरी महाराष्ट्राला त्यांचं ना माहीत नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

रविकांत तुपकर कोण?

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ‘स्वाभिमानी’पासून फारकत घेऊन स्वबळावर दीर्घकालीन शेतकरी आंदोलने केली. २०२३ चा उत्तरार्ध त्यांच्या आंदोलनाने व्यापला आणि चालू वर्षात त्यांचा जामीन कायम राहिल्याने त्यांचा उत्साह दुणावला. यंदा लढायचेच या निर्धाराने त्यांनी लोकसभेची तयारी चालविली आहे. त्यांनी आता अपक्ष अर्ज भरला असून त्यांच्यासमोर सलग तीन वर्षे निवडून आलेल्या प्रतापराव जाधवांचं आव्हान असणार आहे.

प्रतापराव जाधव विजयाची हॅटट्रिक करणार का?

मागील २०१९ च्या लढतीत प्रतापराव जाधव यांनी विजयाची ‘हॅटट्रिक’ केली होती. त्यांनी जळगाव-खान्देशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराम नागो राणे यांच्या सलग ३ विजयाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. राणे यांनी १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये ही किमया केली होती. या दोघा नेत्यांनीच आजवरच्या काळात सलग तीनदा विजयी होण्याचा भीम पराक्रम केला आहे.