मागच्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या एकत्र जमण्यावर आणि हालचालींवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. गरज पडली, तर पुन्हा लॉकडाउन करु असा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात Covid-19 ची स्थिती कशी आहे?
मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दर दिवशी तीन हजारपेक्षा जास्त नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापेक्षा दुसऱ्या आठवडयात १४ टक्के जास्त रुग्णवाढ दिसून आली. ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान २०,२०७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तेच एक ते सात फेब्रुवारी दरम्यान करोना रुग्णांची संख्या १७,६७२ होती. २५ ते ३१ जानेवारी दरम्यान १७,२९३ करोना रुग्णांची नोंद झाली.

मुंबई, पुण्याच्या आसपासचा भाग आणि विदर्भामध्ये मोठी रुग्णवाढ दिसून येतेय. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि अमरावती भागातून ६० टक्के नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

जानेवारी महिन्यात सरासरी दोन हजार ते अडीच हजार इतकी करोना रुग्णांची नोंद सुरु होती. ही संख्या हळूहळू कमी होत असतानाच मागच्या दोन आठवड्यात अचानक रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात का वाढले रुग्ण ?
मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु झालीय त्यामुळे करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची चर्चा आहे. मुंबईतील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकल सेवेकडे बोट दाखवले जातेय. पण खच्चून भरलेल्या बेस्ट बसेसमधून लोक प्रवास करायचे, त्यावेळी हीच रुग्णवाढ का नाही झाली? तसेच विदर्भात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण काय? या प्रश्नांची ठोस उत्तरे नाहीयत. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागात रुग्णवाढ झालेली असू शकते, असे डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.

“विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात ग्राम पंचायत निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे करोनाचा फैलाव झालेला असू शकतो. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात पॉझिटिव्ह करोना रुग्णांचे प्रमाण ३२.७ टक्के आहे. याचाच अर्थ प्रत्येक तिसरा नमुना पॉझिटिव्ह आहे” असे आवटे म्हणाले.

“सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूरमधील सासुर्वे गावात ६२ नवीन करोना रुग्ण आढळले. या गावची लोकसंख्या १९०० आहे. या भागात निवडणूक प्रचार आणि मतदानासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली होती” असे आवटे यांनी सांगितले.

“मागच्यावर्षी करोनामुळे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. पण आता पुन्हा हे सोहळे सुरु झाले आहेत. त्यामुळे सुद्धा करोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळेच अशा कार्यक्रमातील गर्दीवर मर्यादा आणणे आवश्यक असल्याच्या मुद्याकडे आवटे यांनी लक्ष वेधले.”

“लग्न समारंभाला ४००-५०० लोकांची उपस्थिती असते. पण आता ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना हजर राहता येणार नाही. या नियमाची कठोर अमलबजावणी केली जाईल. त्याशिवाय लोकांना लग्न समारंभात मास्क घालणे बंधनकारक असेल” असे डॉ. राहुल पंडित म्हणाले. ते कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत.

महत्त्वाचं म्हणजे करोना चाचण्यांची संख्या आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न थोडे कमी झाले होते. सिंधुदुर्ग, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, नंदूरबार आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये करोना चाचण्यांचे प्रमाण अलीकडे कमी होते.