What is Jain ritual Santhara? भारतीय संस्कृतीतील धार्मिक परंपरा जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ततेचा मार्ग सांगतात. अलीकडेच ब्रेन ट्युमर झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीच्या ‘संथारा व्रता’नंतर झालेल्या मृत्यूमुळे जैन धर्मातील अशीच एक प्रथा चर्चेत आली आहे. या प्रथेत काही कारणास्तव मृत्यू जवळ असताना अन्न- पाण्याचा तसेच सांसारिक गोष्टींचा त्याग करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर या प्रथेची प्राचीन परंपरा नेमकं काय सांगते हे जाणून घेणं माहितीपूर्ण ठरावं.

तब्बल ३००० वर्षांची परंपरा

संथारा प्रथेचा ज्ञात इतिहास तब्बल ३००० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. मौर्य राजवंशाचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने याच व्रताच्या माध्यमातून देहत्याग केला होता. संथारा या व्रताचा उल्लेख सल्लेखना, समाधी-मरण किंवा संन्यास-मरण असाही करण्यात येतो. यात व्यक्ती स्वेच्छेने उपवास करून मृत्यू स्वीकारते. या माध्यमातून पुनर्जन्मासाठी कारणीभूत असणाऱ्या कर्मांचा नाश होतो, अशी जैन भाविकांची समजूत आहे. जैन तत्त्वज्ञानानुसार ही आत्महत्या मानली जात नाही, कारण यात कोणत्याही शस्त्राचा वापर केला जात नाही. तर, शारीरिक आणि मानसिक विकारांचा त्याग केला जातो. सल्लेखना व्रत घेतल्यानंतर विधीची तयारी आणि साधना अनेक वर्षे चालू शकते. सल्लेखना व्रताचे पालन जैन साधू आणि गृहस्थ कोणीही करू शकतं. प्राचीन भारतात स्त्रियाही या व्रताचे पालन करत होत्या, असे दाखले पुराभिलेखीय संदर्भातून मिळतात.

कषाय सल्लेखना

जैन धर्मात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही पाच महान व्रते सांगितली आहेत. याशिवाय इतर सात पूरक व्रतांचाही समावेश होतो. या सात व्रतांमधील दिग्व्रत, भोगोपभोगपरिमाण, अनर्थदंडविरमण ही गुणव्रत आहेत. तर, सामायिक, देशव्रत, प्रोषधोपवास, अतिथीसंविभाग ही शिक्षाव्रत आहेत. सल्लेखना हे एक व्रत या बारा व्रतांना पूरक मानले जाते. सल्लेखना हे व्रत कषाय सल्लेखना आणि काया सल्लेखना या दोन भागांमध्ये विभागले जाते.

जैन साधूंच्या मार्गदर्शनाशिवाय सल्लेखनास मनाई

जैन ग्रंथांमध्ये कोणत्या परिस्थितीत हे व्रत करावे याविषयी मार्गदर्शन केलेले आहे. हे व्रत गृहस्थाने जैन साधूंच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये, अशी सक्त ताकीद आहे. या व्रताची निवड स्वेच्छेने केली जाते. या व्रत काळात केलेल्या उपवासामुळे शरीराचे वजन कमी होते. मृत्यू समीप आल्यावर व्रताधिन व्यक्ती अन्न आणि पाण्याचा पूर्णतः त्याग करते. काही प्रकरणांमध्ये असाध्य आजारानेग्रस्त जैन साधक सल्लेखना व्रताचा स्वीकार करतात, परंतु, या प्रसंगी ते आधी आपल्या आध्यात्मिक गुरूंशी चर्चा करूनच निर्णय घेतात.

त्याग करत देहत्याग

सल्लेखना व्रत काही दिवस किंवा काही वर्षांपर्यंत सुरु राहू शकते. रत्नकरंड श्रावकाचार या ग्रंथाच्या सहाव्या भागात सल्लेखना व्रताच्या प्रक्रियेचे वर्णन केलेले आहे. या प्रक्रियेत सुरुवातीच्या कालखंडात काही प्रमाणात अन्नाचा त्याग करून, दुधावर आणि ताकावर अवलंबून राहावे, असे सांगितले आहे. मग, त्याचाही त्याग करून गरम पाण्यावर राहावे. त्यानंतर गरम पाण्याचाही त्याग करावा आणि निश्चयपूर्वक उपवास करत शेवटी देहत्याग करावा. या व्रताच्या कालखंडात पंचनमस्कार मंत्राचे मनन करत राहावे असे रत्नकरंड श्रावकाचार (१२७–१२८) ग्रंथात म्हटले आहे.

सल्लेखनाचे प्रकार

प्राचीन श्वेतांबर जैन ग्रंथ आचारांग सूत्रात भक्तप्रत्याख्यान, इंगित-मरण आणि पादोपगमण असे सल्लेखनेचे तीन प्रकार सांगितले आहेत. भक्तप्रत्याख्यानात प्रकारात व्रत घेणारी व्यक्ती एखाद्या एकाकी ठिकाणी गवताच्या पलंगावर झोपते, शरीराची हालचाल करत नाही आणि अन्न-पाण्याचा त्याग करून मृत्यू येईपर्यंत तशीच राहते. इंगित-मरणात व्यक्ती जमिनीवर झोपते, हालचाल करते. परंतु ,अन्न घेणे टाळते. पादोपगमणात, व्यक्ती झाडासारखी उभी राहते आणि अन्न व पाणी न घेताच मृत्यू येईपर्यंत तशीच राहते. सल्लेखनेचा आणखी एक प्रकार ‘इत्वर’ (Itvara) आहे, ज्यात स्वतःला मर्यादित जागेत बंदिस्त करून मग उपवासाद्वारे मृत्यू स्वीकारला जातो.

प्राचीन ग्रंथांतही उल्लेख

आचारांग सूत्रात (इ.स.पू. ५ वे शतक ते इ.स.पू. १ले शतक) सल्लेखनेचे तीन प्रकार वर्णन केले आहेत. श्रावकप्रज्ञप्ती या श्वेताबारांच्या ग्रंथात ही प्रथा फक्त साधूंपुरती मर्यादित नाही. भगवती सूत्रा (२.१) मध्येही सल्लेखनेचे सविस्तर वर्णन आहे. दुसऱ्या शतकातील संगमकालीन कविता सिरुपंचमूलम् मध्येही याचा उल्लेख आहे. नवव्या शतकातील आदि पुराण (जिनसेन), दहाव्या शतकातील यशस्तिलक (सोमदेव), वड्डाराधने आणि ललितघाते या ग्रंथांमध्येही या प्रथेचा उल्लेख आहे. हेमचंद्र (इ.स. ११वे शतक) यांनी गृहस्थांचे आचरण विस्तृतपणे वर्णन करताना सल्लेखनेचा थोडक्यात उल्लेख केला आहे. तत्त्वार्थ सूत्र, पुरुषार्थसिद्ध्युपाय, शिलप्पदिकारम् हेही ग्रंथ या प्रथेचा उल्लेख करतात.

डोड्डहुंडी निशिधी शिलालेख

निशडिगा दगडी शिळा

दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटकमध्ये, सल्लेखना व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या स्मरणार्थ स्मृतिशिला किंवा पाऊलखुणा उभारल्या जात. यांना निशिधी, निशिदिगे किंवा निशडिगा म्हणतात. हे शब्द संस्कृतमधील सिद्ध किंवा सद् या धातूपासून तयार झाले आहेत. या निशिधींमध्ये व्यक्तीचे नाव, तारीख, व्रताचा कालावधी आणि केलेल्या इतर तपश्चर्यांचा तपशील दिलेला असतो. सर्वात जुन्या निशिधी (इ.स. ६वे ते ८ वे शतक) साध्या शिळांवर कोरलेल्या आहेत. दहाव्या शतकानंतर त्यात पाऊलखुणा जोडल्या गेल्या आणि अकराव्या शतकानंतर फलक किंवा खांबांवर कोरीव काम केले गेले.

निशिधी

चंद्रगुप्ताकडूनही सल्लेखना

श्रवणबेलगोळे येथे ९३ निशिधी सापडल्या आहेत, ज्यांमध्ये ६ वे शतक ते १९ वे शतक असा कालखंड नमूद करण्यात आला आहे. असं मानलं जातं की, चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरू भद्रबाहू यांनीही श्रवणबेलगोळे येथील चंद्रगिरी डोंगरावर सल्लेखना व्रताचे पालन करून देहत्याग केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवव्या शतकातील शिलालेख

डोड्डहुंडी येथील निशिधीवर प्राचीन कन्नड लिपीत एक लेख आहे. इतिहासकारांनी त्या लेखाचा कालखंड इ.स. ८४० किंवा ८६९ असा ठरवला आहे. या स्मारकावर पश्चिमी गंगा वंशाच्या राजा एरेगंगा नितीमार्ग पहिल्याच्या सल्लेखनेचे दृश्य कोरले आहे. त्यांच्या मुलाने सत्यवाद्याने हे स्मारक उभारले होते.