संदीप नलावडे

गेल्या काही वर्षांपासून दम्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. दमा म्हणजेच अस्थमामुळे जगात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू भारतात होतात. २०१९च्या आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्क्यांनी वाढले असल्याने श्वसनाच्या या आजाराला गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘जागतिक दमा दिन’ साजरा केला जातो. यंदा ७ मे रोजी हा दिवस असून त्यानिमित्त या चिंताजनक आजाराविषयी…

दमा किंवा अस्थमा म्हणजे काय?

दमा किंवा अस्थमा म्हणजे श्वसनमार्गाचा दीर्घकाळ चालणारा एक आजार आहे. या आजारात फुप्फुसांपर्यंत श्वास नेणाऱ्या नलिकांचा दाह होऊन त्या आकुंचन पावतात. त्यामुळे श्वास घेण्याच्या क्रियेत अडथळे निर्माण होतात आणि दम लागतो. हा आजार अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीलाही होऊ शकतो. अस्थमा असणाऱ्या व्यक्तींना काही कारणांमुळे श्वसननलिकेच्या आतील अस्तराला सूज येते आणि श्वसनमार्गाशी संपर्कात असणारे स्नायू आकुंचन पावतात. साहजिकच हा अंतर्गत मार्ग छोटा होतो. त्यामुळे श्वास खूप जोर लावून घ्यावा लागतो आणि दम्याचा झटका येतो. वातावरणामधील ॲलर्जीकारक गोष्टी, विषाणूंचा संसर्ग, धूळ, धूर, धूम्रपानाचे व्यसन, प्रदूषण, हवामानातील बदल, मानसिक ताणतणाव आदी विविध कारणांमुळे दमा होऊ शकतो.

भारतात दमा या आजाराची सद्य:स्थिती

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०२१ च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू दम्याच्या आजारामुळे होतो. दम्यामुळे जगात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू भारतात होतात. २०१९ च्या अहवालाच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्क्यांनी अधिक आहे. १९९०-२०१६ या कालावधीत दम्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ८.६ टक्के होते, तेच प्रमाण सध्या १०.९ टक्के झाले आहे. अस्थमा ही जगभरातील मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सर्वाधिक वारंवार आढळणारी तीव्र स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हण्यानुसार कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अस्थमा हा गरिबीइतकाच अधिक परिणामकारक आहे. २०१९ मध्ये जगभरात २६.२ कोटी रुग्ण दमाग्रस्त आहेत. तर मृत्यूची संख्या ४.५५ लाख आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हण्ण्यानुसार भारतातील ९० टक्क्यांहून अधिक दम्याचे रुग्ण इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉइड्स वापरत नाहीत. शिवाय, ते फक्त तोंडावाटे किंवा इनहेलेशन मार्गाने ब्रॉन्कोडायलेटर औषधे घेतात, ज्यामुळे अधिक त्रास आणि मृत्यू होतात.

हेही वाचा >>> World Press Freedom Day: भारतातील पहिलं वृत्तपत्र Bengal Gazette चा इतिहास माहिती आहे का?

दम्याचे निदान लवकर का केले जात नाही?

दमा हा आनुवंशिक आजार असला तरी वायू प्रदूषणामुळे या आजाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. ॲलर्जीकारक राहिनाइटिस (वाहणारे नाक आणि शिंका येणे), ॲलर्जीकारक पुरळ किंवा ॲक्जिमा आणि मायग्रेनशी याचा संबंध असतो. धाप लागणे हे एक सामान्य लक्षण असले, तरी खोकला (दोन्ही कोरडा, त्रासदायक तसेच कफ उत्पन्न करणारा), छातीत घट्टपणा आणि छातीतून घरघर आवाज येणे ही इतर सामान्य लक्षणे आहेत. दम्याचे रुग्ण अनेकदा खोकल्याची तक्रार करतात, जे रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात असते. अनेकदा रुग्ण खोकला, सर्दी असल्याचे समजून याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान होत नाही. “रुग्णाचा आजारासंबंधी इतिहास जाणून घेऊन आणि स्पायरोमेट्री नावाच्या साधनाचा वापर करून निदान केले जाते, जे अनेकदा दम्याच्या निदानाची पुष्टी करते. स्पायरोमेट्रीचा वापर न केल्यामुळे भारतात दम्याचे निदान फारच कमी आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उपचार करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग कोणता?

हेही वाचा >>> रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरीत, गुंतवणूकदार कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

भारतात नऊ वेगवेगळ्या ठिकाणी ‘ग्लोबल अस्थमा नेटवर्क’ अभ्यास करण्यात आला. ज्यात ६-७ वर्षे वयोगटातील २०,०८४ मुले, १३-१४ वर्षे वयोगटातील २५,८८७ मुले आणि ८१,२९६ प्रौढ सहभागी झाली होते. त्यात दिसून आले की ८२ टक्के लोकांमध्ये अस्थमाचे निदान कमी होते आणि गंभीर दमा असलेल्यांपैकी ७० टक्के लोकांचे निदान झाले नाही. “ दम्यासाठी सर्वात प्रभावी आणि सुरक्षित उपचार म्हणजे ड्राय पावडर इनहेलर किंवा प्रेशराइज्ड मीटर्ड डोस इनहेलरद्वारे ब्रॉन्कोडायलेटरसह किंवा त्याशिवाय इनहेल कॉर्टिकोस्टिरॉइड्स. ही औषधे मृत्यू टाळतात आणि लक्षणे कमी करतात, तरीही ‘ग्लोबल अस्थमा नेटवर्क’ अभ्यासात केवळ पाच टक्के मुले आणि १० टक्के दमा असलेले प्रौढ ही औषधे वापरत होते,” असे डॉक्टरांनी सांगितले. दम्याचा उपचार करण्याचा सर्वात सुरक्षित, जलद आणि प्रभावी मार्ग म्हणजे श्वासाद्वारे औषधे घेणे, यावर डॉक्टरांनी भर दिला आहे.

दम्याबाबत काय समज-गैरसमज आहेत?

दम्याशी संबंधित अनेक समज व गैरसमज आहेत, जे हा आजार वाढविण्यास मदत करतात. दमा हा एक संसर्गजन्य रोग असून तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, असा गैरसमज आहे. मात्र दम्याच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यावर दमा होत नाही. दम्याच्या आजारात श्वासाद्वारे घेतलेली औषधे खूप जास्त आहेत. मात्र इनहेल औषधे अधिक प्रभावशाली असून त्यामुळे इनहेलरचे व्यसन होऊ शकते. जर असे व्यसन जडले तर हे व्यसन सोडण्यासाठी प्रभावी उपाययोजनाही नाही. भारतातील सर्व दम्याच्या रुग्णांचे लवकर व योग्य निदान झाले पाहिजे आणि योग्य औषधे नियमितपणे घ्यावीत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दम्याच्या रुग्णांनी त्यांची श्वासोच्छवासाची औषधे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. रुग्णाचे फुप्फुस निरोगी ठेवण्यासाठी आणि फुप्फुसांना अधिक नुकसान होण्यापासून वाचविण्यासाठी ही औषधे घेणे गरजेचेच आहे.

sandeep.nalawade@expressindia.com