गेल्याच आठवड्यात लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा काढून त्या जागी खलिस्तानचा झेंडा लावण्याचा प्रयत्न खलिस्तानवाद्यांकडून झाला होता. खलिस्तानी आंदोलकांनी भारताचा झेंडा खाली खेचला मात्र उच्चायुक्तालयातील दोन कर्मचाऱ्यांमुळे नामुष्की टळली. या घटनेतील मुख्य आरोपी अवतार सिंह खाडा हा खलिस्तानी लिबरेशन फोर्सशी संबंधित असलेल्या कुलवंत सिंह खुख्राना याचा मुलगा आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा काही वर्षांनी स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीने डोके वर काढल्याचे निदर्शनास आले. गेल्या आठवडाभरात झालेल्या या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी कारवायांचा घेतलेला हा लेखाजोखा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खलिस्तानच्या मागणीचा इतिहास
स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीचा जोर हा ७० च्या दशकात मूळ धरू लागला. परंतु त्याची खरी पाळेमुळे ही स्वातंत्र्यपूर्व इतिहासात दडलेली आहेत. पंजाब हा भारतातील सर्वात मोठा प्रांत होता. विद्यमान पाकिस्तान मधील पंजाब, भारतातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश असा एकत्रित प्रदेश पंजाब म्हणून ओळखला जात होता. १९२९ मध्ये पूर्ण स्वराज्याच्या मागणीला विरोध करणाऱ्या तीन गटापैकी एक गट म्हणजे मास्टर तारासिंग यांचा शिरोमणी अकाली दल हा होता. मास्टर तारा सिंग यांनी शिखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली. त्यानंतर अनेकदा अस्फूट आवाजात स्वतंत्र पंजाबसाठी मागणी केली जात होती. १९६६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या काळात स्वतंत्र राज्याची मागणी भारत सरकारकडून मान्य करण्यात आली. तरीही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांच्या दरम्यान चंदिगढ हा कळीचा मुद्दा आजतागायत आहेच.

जगजित सिंह चौहान यांनी ब्रिटनमध्ये खलिस्तानी चळवळ सुरू केली. खलिस्तानी आंदोलनाचा इतिहास हा रक्तरंजीत आहे यात अनेक ज्ञात- अज्ञातांचे बळी गेले आहेत. या आंदोलनाच्या मुळाशी असलेला आनंदपूर साहीब हा ठराव १९७८ मध्ये अकाली दलाने पंजाब मध्ये संमत केला. यात केंद्र सरकारपेक्षा पंजाब सरकारला अधिक अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर ८० च्या दशकात पंजाबमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांची भूमिका या मध्ये प्रमुख होती. या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचे खरे काम भिंद्रनवाले यांनीच केले. या आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये हिंदूंवर गोळीबार केल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाब मध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. भिंद्रनवाले यांची आक्रमकता प्रचंड होती. त्यांनी शिखांचे धर्मस्थळ असलेल्या सुवर्णमंदिरातूनच या चळवळीची सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. पर्यायाने १९८२ च्या आसपास सुवर्णमंदिर हा खलिस्तानी चळवळीचा प्रमुख अड्डा झाला होता. पंजाबातील वाढत्या हिंसाचाराला भिंद्रनवाले जबाबदार आहेत, त्यामुळेच त्यांना पायबंद घालणे गरजेचे होते, हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे आदेश दिले.

आणखी वाचा: महाराष्ट्राचे राजकारण व ‘दूध सी सफेदी’ देणारी निरमा वॉशिंग पावडर

ऑपरेशन ब्लू स्टार काय होते?
ऑपरेशन ब्लू स्टार हे १ जून १९८४ रोजी हाती सुरू झाले. यात सुवर्ण मंदिराला वेढा घालण्यात आला. हे सशस्त्र ऑपरेशन होते. यात ८४ जवान शहीद झाले, दोनशेहून अधिक जखमी झाले होते. याशिवाय ४९३ आंदोलक मारले गेले तर ८६ जखमी होते. शीख नागरिकांकडून देशभरातून या ऑपरेशनचा निषेध करण्यात आला. याचीच परिणीती ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधानांचे अंगरक्षक असलेल्या सतवंत सिंग आणि बेआंत सिंग यांनी इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. १० ऑगस्ट १९८६ रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा इतिहास प्रसिद्ध असला तरी खलिस्तानच्या इतिहासामध्ये अनेक रक्तरंजीत घटनांचा समावेश आहे.


एअर इंडियाच्या विमानात भीषण स्फोट
खलिस्तानवाद्यांनी एअर इंडियाच्या ‘कनिष्का फ्लाइट १८२’ मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवून आणला. सुरवातीस या घटनेची नोंद अपघात म्हणून करण्यात आली होती. यात ३२९ नागरिक व विमानातील कर्मचारी होते. त्यातील दोनशेहून अधिक कॅनडाचे नागरिक होते. हा अपघात नव्हता तर तो खलिस्तानवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट होता. हे विमान टोरांटो ते लंडन व पुढे मुंबईसाठी रवाना होणार होते. या प्रवासादरम्यान विमान हे नेहमीप्रमाणे मॉन्टेरल येथे थांबले. विमानतळावर कॅनडातील स्थानिक कर्मचाऱ्यानी तीन संशयास्पद पॅकेटस् बाहेर काढले व त्यानंतर ते लंडनसाठी रवाना झाले. हीथ्रो टॉवरला पोहाचण्याच्या सुमारे पाऊणतास आधी हे विमान अचानक रडारवरून गायब झाले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता दुर्दैवी घटना लक्षात आली. तातडीने घटनास्थळी आपत्कालीन सेवा पुरविण्यात आली. अपघातातील १३१ प्रवाशांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. या भीषण स्फोटात कुणीही वाचू शकले नाही.

आणखी वाचा: २३०० वर्षांपर्यंत मागे जातो ‘धाराशिव’चा पुरातत्त्वीय इतिहास!

खलिस्तानवाद्यांनीच घडवलेला स्फोट
सुरुवातीस अपघात म्हणून नोंद झालेली ही घटना नंतर दहशतवादी कृत्य असल्याचे लक्षात आले. खलिस्तानवाद्यांनीच हा स्फोट घडवून आल्याचे उघडकीस आले. १९८४ साली झालेल्या स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून झालेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला होता. तलविंदर सिंग परमार हा या हल्ल्यामागचा सूत्रधार असल्याचे कॅनडा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. मात्र अपुऱ्या पुराव्यांमुळे त्याची सुटका झाली. भारतात परत आल्यानंतर पंजाब पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. या बॉम्बहल्ल्यातील दूसरा संशयित इंद्रजीत सिंग रेयत हा होता. तो मूळ भारतीय असला तरी व्हँकुव्हरचा नागरिक होता. त्याला २००३ मध्ये पकडण्यात आले व पाच वर्षाची शिक्षा झाली. विशेष म्हणजे त्याआधी त्याच दिवशी म्हणजे २३ जून १९८५ मध्ये जपान येथे नारीता विमानतळावर झालेल्या दुसऱ्या एका बॉम्ब हल्ल्यासाठी बॉम्ब निर्मितीत मदत केल्या प्रकरणी त्याला १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. रिपुदमन सिंग मलिक व अजैब सिंग बागरी या दोन आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडण्यात आले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन २००६ मध्ये कॅनडा सरकारने या घटनेवर चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने २०१० मध्ये पाच पानी अहवाल सादर केला. या अहवाला अंतर्गत कॅनडाच्या सुरक्षायंत्रणेतील समन्वयाचा अभाव हा या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरल्याचे नमूद करण्यात आले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb blast in air india flight 182 canada operation blue star indian army indira gandhi khalistani movements bloodshed hisorty svs
First published on: 23-03-2023 at 17:36 IST