कर्नाटक सरकारने देवदासींच्या मुलांना त्यांच्या वडिलांचे नाव न विचारता जातप्रमाणपत्रासह उत्पन्नाचा दाखला आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केली होती. आयोगाची ही मागणी कर्नाटक सरकारने मान्य केली. अधिकृत आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये देवदासींच्या मुलांची संख्या ४५ हजारांपेक्षा अधिक आहे. तसेच केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने देवदासींचे सर्वेक्षण करून १२ हजार नावांचा या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या देवदासी नेमक्या कोण आहेत? ही देवदासी प्रथा नेमकी काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण: चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF-7 Variant चे भारतात ४ रुग्ण; संसर्गाची लक्षणं कोणती? लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, कारण…

देवदासी प्रथा नेमकी काय आहे?

देवदासी ही एक प्रथा आहे. या प्रथेनुसार मुलींचे देवाशी लग्न लावले जाते. देवाची दासी असं त्यांना संबोधलं जातं. देवदासी ही प्रथा सातव्या शतकात दक्षिण भारतातील चोला, चेरा आणि पांड्या साम्राजाच्या काळात सुरू झाली. या देवदासींना इतर कोणाशी विवाह करण्याची परवानगी नव्हती. सुरुवातीच्या काळात देवदासींना मंदिरात पूजा आणि मंदिराची देखरेख करण्याची जबाबदारी दिली जात होती. तसेच त्यांना भरनाट्यम आणि शास्रीय संगीताचा सराव करणेही बंधकारक होते. मात्र, मध्ययुगात काही सामाजिक घटकांनी या महिलांचं लैंगिक शोषण करण्यास सुरूवात केली. धार्मिक रूढींच्या नावाखाली समाजातील उच्चभ्रू पुरुष या देवदासींना आपल्या वासनेचे शिकार करीत असत. यातूनच ‘देवाची बायको, साऱ्या गावाची” ही म्हण प्रचलित झाली. ही प्रथा आंध्रप्रदेशातील एका प्रथेवर आधारीत असल्याचे म्हटलं जातं, मुलींना मंदिरात दान दिल्याने गावावरील सर्व संकटं दूर होतात, अशी त्याकाळी मान्यता होती. त्यातूनच ही प्रथा सुरू झाली, असं म्हटलं जातं.

आजही सुरू आहे देवदासी प्रथा

ब्रिटीशांनी १९८८ मध्ये ही प्रथा बेकायदेशीर ठरवली होती. त्यानंतर आजपर्यंत देवदासींची संख्या कमी झालेली असली, तरी आजही आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यात ही प्रथा सुरू असल्याचे पाहायला मिळतं. महाराष्ट्रात या देवदासींना माथांगी या नावाने ओळखले जातं, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्यांना जोझिनी किंवा मथम्मा, तसेच कर्नाटकात देवदासी आणि तामिळनाडूमध्ये मथामा नावाने त्यांना ओळखलं जातं.

हेही वाचा – विश्लेषण: थेट पुरावा नसला तरी लाचप्रकरणी शिक्षा शक्य… काय सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

देवदासी प्रथेविरोधात कायदा?

स्वातंत्र्यानंतर या प्रथेविरोधात सर्वप्रथम तत्कालीन मद्रास सरकारने कायदा संमत केला होता. तसेच महाराष्ट्रातही २००५ साली या प्रथेविरोधात महाराष्ट्र देवादासी प्रणाली निर्मूलन कायदा संमत करण्यात आला. याबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही देवदासी प्रतिबंध कायदा संमत करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजही देवदासी प्रथा का सुरू आहे?

सर्वोच्च न्यायालयानेही ही प्रथा बंद करण्याचे निर्देश दिलेले असले, तरी आजही अनेक राज्यांमध्येही देवदासी प्रथा सुरू आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जर एखाद्या कुटुंबाने मुलीला देवाला समर्पित केले, तर देव त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. तसेच त्यांच्या कुटुंबावरील संकटं दूर करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे ही प्रथा आजही सुरू आहे. तसेच बेरोजगारी आणि गरीबीदेखील ही प्रथा सुरू राहण्यामागे महत्त्वाचे कारण आहे.