केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील ५७६ मातृभाषांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. हे सर्वेक्षण ‘फील्ड व्हिडिओग्राफी‘सह करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक भाषांचे मूळ स्वरूप आणि त्यात झालेल्या बदलाचे विश्लेषण करण्याकरिता ही माहिती राष्ट्रीय माहिती केंद्रात डिजिटल स्वरुपात संग्रहित (वेब अर्काइव्ह) करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या २०२१-२२ च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. मात्र, मातृभाषा सर्वेक्षण नेमकं काय आहे? आणि भारतात नेमक्या किती मातृभाषा बोलल्या जातात? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – विश्लेषण: ‘टीपू सुलतानची ‘जामिया’ मशीद नव्हे, हनुमान मंदिर’, कर्नाटक हाय कोर्टासमोर नवा वाद; वाचा काय आहे प्रकरण!

मातृभाषा सर्वेक्षण नेमकं काय आहे?

भारत सरकारर्फे नुकताच देशभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांचं एक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. गेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त दशकांपासून बोलल्या जाणाऱ्या मातृभाषांचे विश्लेषण करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून व्हिडिओ आणि ऑडियो पद्धतीने माहिती गोळा करण्यात आली आहे. ही माहिती राष्ट्रीय माहिती केंद्र आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे विश्लेषण करण्यासाठी जतन केली जाणार आहे.

देशभरात किती मातृभाषा?

पीटीआयने दिलेल्या माहिती नुसार, २०११च्या भाषिक जनगणनेच्या आकडेवारीचे २०१८ मध्ये विश्लेषण करण्यात आले होते. त्यानुसार देशात १९ हजार ५०० पेक्षा भाषा या मातृभाषा म्हणून बोलल्या जात असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, या भाषांची छाननी केल्यानंतर त्यांना राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या १२१ मातृभाषांमध्ये वर्गीकृत करण्यात आले असल्याची माहिती जनगणना आयुक्तांनी दिली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : परदेशात पळालेल्या संजय भंडारींचे लवकरच प्रत्यार्पण, नेमके आरोप काय?

सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती?

२०११च्या भाषिक जनगणनेनुसार हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तब्बल ५२.८ कोटी नागरिक हिंदी बोलत असून टक्केवारीत बोलायचं झालं तर ४३.६ टक्के नागरिकांनी हिंदी ही त्यांची मातृभाषा असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगाली भाषा आहे. जवळपास ९७ लाख नागरिकांनी बंगाली ही त्यांची मातृभाषा असल्याचे म्हटले आहे. टक्केवारीमध्ये बोलायचे झाल्यास देशभरातील ८ टक्के नागरिक हे बंगाली बोलत असल्याचे पुढे आले आहे.

मातृभाषेचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणांनुसार आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना शाळांमधून मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवं, असं म्हटलं होते. आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना मातृभाषेत शिक्षण दिल्यास त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात, असंही या अहवालातून सांगण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषांमधूनच द्यावे, हा मुद्दा आजपर्यंतच्या शैक्षणिक धोरणांच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : स्मार्ट होम आयओटी उपकरणांसाठी नवीन मानक असलेलं ‘मॅटर’ नेमकं काय?

लोकसंख्येच्या जनगणनेची स्थिती काय?

आगामी जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. ही जनगणना २०२१ मध्ये होणार होती. मात्र, करोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, आगामी जनगणनेमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यापूर्वी ‘मॅपिंग’ प्रक्रियेंतर्गत जिल्हे, उपजिल्हे, गावे, शहरे आणि महानगरांतील प्रशासकीय कामकाजपद्धती दर्शविणारे नकाशे तयार करणे, आदी कामंही सुरू करण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is mother tongue survey of india spb
First published on: 10-11-2022 at 07:00 IST