आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांच्या गोमूत्र किंवा गोमूत्रातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल व अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म याविषयीच्या विधानामुळे संशोधक व तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. कामकोटी गोमूत्रावरील विविध अभ्यासांचा संदर्भ देत आहेत. ‘न्यूज १८’ने याविषयी संशोधकांशी संवाद साधत, त्यांची मते जाणून घेतली. गोमूत्राच्या वापरावर औषधविज्ञान आणि स्वतंत्र पशुवैद्यकीय शास्त्रज्ञांनी त्याच्या औषधी फायद्यांविषयी सांगितले, परंतु, आधुनिक कृषी शास्त्रज्ञांचा एक गट वैद्यकीय हेतूंसाठी त्याच्या वापरास समर्थन देत नाही. असे असले तरी सर्व शास्त्रज्ञांच्या एकमतानुसार, त्याचा शोध घेण्यासाठी अधिक तपशीलवार विश्लेषण करणे आवश्यक आहे. आयआयटी संचालकांनी नक्की काय दावा केलाय? त्यावर तज्ज्ञांचे मत काय? याविषयी जाणून घेऊ.

आयआयटी-एमच्या संचालकांनी माटू पोंगलच्या दिवशी (१५ जानेवारी) गाईंच्या आश्रयस्थानी बोलताना एक विधान केले. माटू पोंगल हा एक तमीळ सण आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “एकदा मी तापानं फणफणत असताना गोमूत्र प्राशन केलं. त्यानंतर मी लगेच बरा झाला.“ त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस व द्रमुक पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांच्या गोमूत्र किंवा गोमूत्रातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल व अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म याविषयीचे विधान केले. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

हेही वाचा : पाकिस्तानला मोठा धक्का; सिंधू जल कराराबाबत तज्ज्ञांची भारताला साथ, नेमके प्रकरण काय?

कामकोटी यांनी, गोमूत्रातील अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि पचन सुधारण्याच्या गुणधर्मांबद्दलही सांगितले. ते म्हणाले, “मोठ्या आतड्यांशी संबंधित आजार इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारख्या समस्यांवर गोमूत्र उपयुक्त ठरू शकते.” कामकोटी यांनी केलेल्या या विधानावर एका बाजूने त्यांच्यावर टीका होत आहे; तर दुसऱ्या बाजूने त्यांचे कौतुक केले जात आहे.

गोमूत्र फायदेशीर आहे? संशोधक काय सांगतात?

कामकोटी यांनी उल्लेख केलेल्या ‘केमोथेरप्युटिक पोटेन्शियल ऑफ काउ युरीन : अ रिव्ह्यू’ या पेपरच्या प्रमुख संशोधक डॉ. गुरप्रीत कौर रंधावा यांनी, “आयुर्वेद तसे सांगतो. आमचे संशोधन हे पैलू लक्षात घेऊन, आधीच प्रकाशित झालेल्या लेखांवर आधारित होते,” असे ‘न्यूज १८’ला सांगितले. अमृतसरमध्ये काम करणाऱ्या डॉ. रंधावा म्हणाल्या की, गोमूत्राचा वापर आयुर्वेदिक बहु-फॉर्म्युलेशन तयार करण्यासाठी केला जातो. “कोणत्या प्रकारचे गोमूत्र वापरले जाते हे समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. ते नवीन, संकरित वाणांचे नसून, पारंपरिक भारतीय वासरू असणे महत्त्वाचे असते. या दोन जातींद्वारे तयार होणाऱ्या मूत्रामध्ये फरक आहे,” असेही त्यांनी सांगितले.

गोमूत्राचे उपचारात्मक परिणाम दिसून आले असल्याचे सांगत त्यांनी आयुर्वेदात होणारे संशोधन हे आधुनिक संशोधनाच्या मानकांपेक्षा वेगळे असल्याचेही सांगितले. “आयुर्वेद ही प्राचीन प्रथा आहे, जी पिढ्यान् पिढ्या सुरू आहे आणि ती आधुनिक समाज आणि संशोधकांसमोर सिद्ध करण्याची गरज नाही,” असे त्या म्हणाल्या. पेपरमध्ये, रंधावा आणि त्यांचे सह-लेखक राजीव शर्मा यांनी, “भारतीय पारंपरिक ज्ञान आयुर्वेदातून उद्भवते, जिथे बॉस इंडिकसला त्याच्या असंख्य वापरासाठी उच्च स्थानावर ठेवले जाते. मूत्र हे गाईच्या उत्पादनांपैकी एक आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. विविध अभ्यासांमध्ये गाईच्या मूत्राची चांगली प्रतिजैविक क्रिया आढळली आहे, ज्याची तुलना ऑफलोक्सासिन, सेफपोडॉक्साईम व जेंटामायसिन यांसारख्या मानक औषधांशी तुलना करता येते, असे स्पष्ट केले आहे.

कामकोटी यांनी, गोमूत्रातील अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि पचन सुधारण्याच्या गुणधर्मांबद्दलही सांगितले. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

गोमूत्रामुळे अँथेलमिंटिक व अँटीनोप्लास्टिक क्रियादेखील होत असते, असेही या पेपरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मदेखील आहेत आणि पर्यावरणाच्या बदलामुळे डीएनएचे नुकसान यामुळे टळू शकते. संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनात, गोमूत्र एकट्याने वापरले जाऊ शकते किंवा प्रतिकारशक्तीचा विकास रोखण्यासाठी आणि मानक प्रतिजैविकांचा प्रभाव वाढविण्यासाठी सहायक म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो, असेही त्यात सांगण्यात आले आहे.

“पुरेशा ज्ञानाच्या अभावामुळे वापर कमी”

कामकोटी यांनी संदर्भित केलेला आणखी एक पेपर ‘रिव्ह्यू ऑन गोमूत्र’ परेश ए. पाटील, विठ्ठल व्ही. भोसले व फार्माकॉग्नोसी विभागाच्या वर्षा पी. गिरासे यांनी लिहिला आहे, जो आशियाई जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यात असे म्हटले आहे, “गोमूत्र प्रदीर्घ परंपरा असलेला असाच एक नैसर्गिक उपाय आहे. असे मानले जाते की, यात विविध औषधी आणि कृषी उपयोग आहेत. पारंपरिक पद्धतींनुसार, अनेक रोगांवर नैसर्गिक उपायांनी उपचार केले जातात. परंतु, आज या उपायांबद्दल पुरेशा ज्ञानाअभावी त्यांचा वापर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.” एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये उपलब्ध असलेल्या या पेपरमध्ये असे म्हटले आहे की रासायनाधारित औषधे आराम देतात; पण शरीरात जास्त रासायनिक घटक गेल्यास कधी कधी साइड इफेक्ट्स होतात किंवा त्यामुळे यकृत व मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचू शकते.

‘पबमेड’वर उपलब्ध असलेला दुसरा पेपर, ‘गोमूत्राची केमोथेरप्युटिक पोटेन्शियल ऑफ काउ युरीन’मध्ये असे म्हटले आहे, “ऐतिहासिकदृष्ट्या गोमूत्र आणि समुद्री मीठ यांचे मिश्रण सामान्यतः सुजेवर विशेषत: ज्यांना शारीरिक दुखापत होते, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरले जात असे. या उपचारात्मक परिणामाचे श्रेय युरोकिनेजच्या उपस्थितीला दिले जाते.” गोमूत्रात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अगदी सोन्याचे क्षार यांचाही समावेश होतो. नियमितपणे भारतीय गोमूत्र किंवा दुधाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये सोन्याच्या क्षारांची उपस्थिती अनेकदा त्यांच्या रंगाशी संबंधित असते. मानवी आणि गोमूत्र दोन्हीमध्ये युरोकिनेज असते. हे एक एन्झाईम आहे, जे विशिष्ट कर्करोगविरोधी औषधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आठवड्यातून एकदा गोमूत्र सेवन केल्याने कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते, असे मानले जाते. परंतु, कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत ते कुचकामी आहे,” असे पेपरमध्ये म्हटले आहे.

उत्सर्जित प्राणी द्रव मानवी वापरासाठी अयोग्य : सेवानिवृत्त शास्त्रज्ञ

जीकेव्हीकेमधील कृषी विज्ञान विद्यापीठ येथील पशुविज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. बी. एल. चिदानंद यांनी असे म्हटले आहे की, गोमूत्र मानवी वापरासाठी योग्य नाही. “नेफ्रॉलॉजिस्ट मानतात की, गोमूत्र हा एक टाकाऊ पदार्थ आहे आणि त्याचे सेवन करू नये. त्यात एनपीके (नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम) आहेत आणि ते शेतीच्या वापरासाठी आहेत. मानवी वापरासाठी नाही.” ते पुढे सांगतात, “गोमूत्राचे मानवाने सेवन करणे योग्य नाही. हा कचरा एखाद्या प्राण्याद्वारे उत्सर्जित होतो. एखाद्या प्राण्याचे टाकाऊ पदार्थ एखाद्या मनुष्यासाठी कसे फायदेशीर असू शकतात. कारण- मनुष्यदेखील तांत्रिकदृष्ट्या एक प्राणी आहे.” जेव्हा गोमूत्र आणि गाईच्या उत्पादनांचा विचार केला जातो, तेव्हा ते शेतीसाठी वापरण्यात काहीच गैर नाही कारण- त्याचे चांगले परिणाम आहेत. पक्षी आणि प्राण्यांचे मलमूत्र किंवा विष्ठा खत म्हणून वापरले जाते, असेही त्यांनी नमूद केले.

“लघवी बाहेर पडताच त्याचा उपयोग होत नाही. एकदा ते गोळा केल्यावर, ते दोन ते तीन आठवडे साठवले जाईल, आंबवले जाईल किंवा मिश्रित पदार्थ म्हणून वापरले जाईल आणि नंतर वनस्पतींवर फवारणी केली जाईल. या वेळेपर्यंत त्यात बुरशीविरोधी, सूक्ष्म जीवविरोधी मूल्ये विकसित होतात आणि नंतर वनस्पतींच्या वाढीसाठी वापरली जातात”, असे त्यांनी ‘न्यूज १८’ला सांगितले. वैद्यकीय उपचारांसाठी गोमूत्र वापरण्याच्या मुद्द्यावर डॉ. चिदानंद यांनी अधिक संशोधन करण्याची मागणी केली.

ज्या औषधामुळे आराम मिळतो, ते एक उपयुक्त औषध : डॉ. तमिलिसाई सुंदरराजन

भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते व तेलंगणाचे माजी राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन म्हणाल्या की, गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी प्रभाव असल्याचे आढळून आले असताना हा आक्षेप म्हणजे नकारात्मक प्रचार आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ सुंदरराजन म्हणाल्या, “एखाद्या रुग्णाला एखाद्या विशिष्ट उत्पादनाच्या किंवा औषधाच्या वापरामुळे आराम मिळत असेल, तर ते एक उपयुक्त औषध आहे. तमीळमध्ये एक म्हण आहे की, एखाद्या रोगाचे दुःख केवळ रुग्णालाच जाणवते आणि औषधाची शक्ती व परिणामकारकता केवळ डॉक्टरांनाच जाणवते.

तमिळनाडूच्या राजकारण्यांना गोमांस खाण्यात कोणतीही अडचण वाटत नाही; परंतु गोमूत्र वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असल्याचा दावा करणाऱ्या गोष्टी ते स्वीकारणार नाही. “अनेक कंपन्या गोमूत्राचा प्रचार करतात आणि तेलंगणातील सुप्रसिद्ध औषध कंपन्यांद्वारे त्याची व्यावसायिक विक्री केली जाते; परंतु ते ताबडतोब सेवन केले जात नाही, उदाहरणार्थ- त्यातील वास काही प्रमाणात काढून टाकला जातो आणि गोमूत्राचेदेखील स्वतःचे गुणधर्म आहेत,” असे सुंदरराजन म्हणाल्या. परंतु, गोमूत्राचे परिणाम अधोरेखित करण्यासाठी आणखी बरेच संशोधन होण्यासह प्रयोगशाळेत चाचणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ढेकर किंवा अपचन यांवर सर्व जण सुंठीचा उपाय करतात. ही गोष्ट सिद्ध झालेली नसली तरी प्रचलित वापर आणि आयुर्वेदानुसार ते उपयुक्त असल्याचे सांगितले जाणे हेदेखील त्याचे प्रमाण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर व राजकीय विश्लेषक सुमंथ सी. रमण म्हणाले की, कामकोटी यांनी कोणत्या संदर्भाचा संदर्भ दिला. याबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली, ज्यात ते गोमूत्र प्यायले आणि त्यांचा ताप बरा झाला. ही एक घटना होती, जी कदाचित पूर्वी घडली असेल. तमिळनाडूतील नागरकोईल येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ‘पंचगव्याचे (गाईचे दूध, मूत्र, शेण, तूप व दही यांचे मिश्रण) परिणाम’ शिकवत आहे, असे रमण सांगतात.

हेही वाचा : महाकुंभातील ‘खोया-पाया केंद्र’ काय आहे? हरवलेल्या लोकांना प्रियजनांना शोधण्यात कशी होतेय केंद्राची मदत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोक गाईच्या मागे उभे राहतील, मूत्र मिळवतील आणि ते थेट प्राशन करतील, असे नाही. जेव्हा आपण म्हणतो की, गोमूत्रात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, तेव्हा याचा अर्थ असा होतो की ते गोमूत्र डिस्टिलेट आहे आणि त्यातून प्रोटीनॉइड्स आणि अमिनो ॲसिड काढले जाते. प्रोटीनॉइड्समध्ये जीवाणूविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. म्हणजे लोकांनी थेट लघवी प्यायला सुरुवात करावी का? तर तसे अजिबात नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी अधिक संशोधन होणे आवश्यक आहे,” असे डॉ रमण म्हणाले.