उद्योजक संजय कपूर यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजय कपूर यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले. सायंकाळी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
आतापर्यंतच्या अहवालांनुसार, पोलोचा सामना खेळत असताना संजय कपूर यांच्या तोंडात मधमाशी शिरली आणि त्यांच्या घशात अडकली यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मधमाशीमुळे मृत्यू होऊ शकतो का, मधमाश्या किती घातक असू शकतात याचा आढावा.
संजय कपूर यांचा मृत्यू कशामुळे?
उद्योजक आणि बॉलिवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांचे विभक्त पती संजय कपूर यांचा १२ जून २०२५ रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका हे होते. मृत्यू होण्यापूर्वी संजय कपूर यांनी अचानक तोंडात काहीतरी गिळल्याची तक्रार केली होती. कपूर यांच्या तोंडात मधमाशी गेल्याचे नंतर सिद्ध झाले, ज्यामुळे त्यांना अॅनाफिलेक्टिक शॉक येऊन हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले जात आहे.
मधमाशी गिळल्यामुळे त्रास होऊ शकतो का?
कीटक शास्त्रज्ञ प्राध्यापक रश्मी माने यांनी सांगितले की सर्व मधमाश्या विषारी नसतात. याचबरोबर चुकून कोणतीही मधमाशी मानवाच्या तोंडात गेली तर मानवाचा त्यामुळे तात्काळ मृत्यू होतो असे नाही. जर ती मधमाशी अन्ननलिकेत जाऊन बसली आणि तिने डंख मारला तर धोका असतो. कपूर यांच्या अहवालात मधमाशीच्या प्रजातीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या घशात गेलेली मधमाशी विषारीच असेल असे म्हणता येत नाही. याचबरोबर त्यांचा मृत्यू हा मधमाशीमुळेच झाला आहे हे म्हणणेदेखील अयोग्य. कारण संजय कपूर यांनी फक्त त्यांच्या सहकाऱ्यांना तोंडात माशी गेल्याचे सांगितले होते. पण अनेकदा तोंडात माशी गेली या भीतीने घाबरून झटका येऊन मृत्यू पावण्याची शक्यता अधिक असते. माशीने डंख जरी केला तरी तात्काळ मृत्यू होण्याची शक्यता फार कमी असते.
मधमाश्यांचे किती प्रकार आहेत?
मधमाश्या हे उडणारे कीटक आहेत ज्यामध्ये आठ मान्यताप्राप्त प्रजाती आणि ४३ उपप्रजाती आहेत. सर्वात सामान्य आणि व्यापकपणे वितरित प्रजाती म्हणजे पश्चिम मधमाशी (एपिस मेलीफेरा), ज्यामध्ये जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांना आणि हवामानाशी जुळवून घेतलेल्या सुमारे २४ उपप्रजाती आहेत. प्रत्येक उपप्रजातीमध्ये वर्तन, स्वरूप आणि मध उत्पादन यासारखी स्वतंत्र वैशिष्ट्ये असू शकतात.
कोणती मधमाशी सर्वात घातक?
‘मर्डर हॉर्नेट’ ही जगातील सर्वात मोठी मधमाशी आहे (सुमारे ५ सें.मी. लांब, पंख ७ सें.मी. पर्यंत). तिच्या डंखात अतिशय शक्तिशाली विष असते, जे मानवाच्या चेतासंंस्थेवर व हृदयावर परिणाम करू शकते. एका वेळेला अनेक डंख केल्यास मानवाचा मृत्यू होऊ शकतो.आशियात (विशेषतः जपान, चीन) यामुळे दरवर्षी काही मृत्यू होतात.
भारतात घातक मधमाश्यांचे प्रकार कोणते?
भारतात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या आणि आक्रमक मधमाश्यांपैकी एक म्हणजे ‘रॉक बी’. त्या एकच पोळे बनवत नाहीत तर भरपूर पोळी बनवतात. ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटते, सूर्यप्रकाश आणि पाणी विपुल प्रमाणात मिळते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात फुलोरा असतो तेथे पोळे करतात. यांचे विष घातक असून अनेक डंख झाल्यास मृत्यूही होऊ शकतो. ग्रामीण भागात दरवर्षी डोंगरमधमाश्यांमुळे स्थानिकांना गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्यानंतर ‘एपीस सेरेना’ फारशी आक्रमक नसते, पण त्रास दिल्यास डंख करते. अॅलर्जीक व्यक्तींना यांचा धोका अधिक असतो. ‘कारपेंटर बी’ दिसायला गडद काळसर आणि मोठ्या आकाराच्या असतात. सामान्यतः माणसांपासून दूर राहतात, पण त्यांचा डंख विलक्षण वेदनादायक असतो. पण यांचे विष फारसे घातक नसते.
धोका केव्हा असतो?
अनेक मधमाश्यांनी एकाच वेळी डंख केला. किंवा व्यक्तीला मधमाशीच्या विषाची तीव्र अॅलर्जी असेल, तर धोका संभवतो. याचबरोबर मधमाशीने डंख केल्यावर श्वास घेण्यास अडचण, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे असते.