वर्ल्ड गोल्ड कौन्सिलतर्फे भारतीय सोने बाजाराच्या सखोल विश्लेषणात्मक अभ्यासाचा भाग म्हणून ‘गोल्ड रिफायनिंग अॅण्ड रिसायकलिंग’ हा अहवाल आज सादर केला. भारतातील सोन्याची वाढती मागणी लक्षात घेता पुनर्वापर हा यापुढेही महत्त्वाचा मुद्दा असेल आणि काही काळानंतर आता स्थिरतेकडे वाटचाल करणाऱ्या रिफायनिंग क्षेत्रातही स्थिर गतीने प्रगती होईल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील गोल्ड रिफायनिंग उद्योगाने लक्षणीय प्रगती अनुभवली आहे. सध्या भारत सोने पुनर्वापरात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. २०१३ ते २०२१ या काळात भारतातील गोल्ड रिफायनिंगची क्षमता १५०० टनांनी (५०० टक्के) वाढली आहे. इतकेच नाही, मागील पाच वर्षांत देशातील एकूण सोन्याच्या पुरवठ्यातील ११ टक्के सोने ‘जुन्या सोन्या’तून आले आहे. सोन्याचा बदलणारा दर, भविष्यात दर वाढण्याचा अंदाज आणि व्यापक वित्तीय दृष्टिकोन यामुळे हा बदल दिसून येत आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे भारतातील रिजनल सीईओ सोमसुंदरम पीआर म्हणाले, “सराफा बाजारातील यापुढील बदलांमुळे जबाबदार सोर्सिंग, सोन्याच्या बार्सची निर्यात आणि जुन्या सोन्याचा सातत्याने पुरवठा झाल्यास एक स्पर्धात्मक रिफायनिंग हब म्हणून पुढे येण्याच्या क्षमता भारतीय बाजारपेठेत आहेत. स्थानिक रुपयाची किंमत आणि अर्थव्यवस्थेच्या चक्रावर अवलंबून असलेली देशांतर्गत पुनर्वापर बाजारपेठ ही आजही काहीशी असंघटित आहे. मात्र, सुधारित जीएमएस (गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम) सारख्या उपक्रमातून या बाजारपेठेला लाभ मिळालाय हवेत. सोन्याचा अधिशेषही मुख्य प्रवाहात यावा आणि सराफा बाजारातील उलाढालींमुळे लिक्विडिटी किंवा रोकडात रुपांतर करण्याची सुलभता वाढावी यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आमच्या अहवालात हेसुद्धा नमूद करण्यात आले आहे की दागिने बाळगण्याचा कालावधी सातत्याने कमी होत आहे. कारण, तरुण ग्राहक वारंवार डिझाइन्स बदलू इच्छितात. या ट्रेंडमुळे पुनर्वापराचे प्रमाण वाढण्यात साह्य होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला, अधिक उत्पन्न आणि दमदार आर्थिक विकासामुळे थेट विक्रीचे प्रमाण कमी होईल आणि सोने थेट विकण्याऐवजी ते तारण म्हणून ठेवणे ग्राहकांसाठी अधिक सोयीचे असेल. त्यामुळेच, अधिक चांगले लाभ आणि सोने पुरवठा साखळीत अथपासून इतिपर्यंत तंत्रज्ञानावर आधारित पर्याय पुरवून संघटित पुनर्वापराला पाठबळ देणे आवश्यक आहे.”

भारतातील सोने पुनर्वापराची सद्यस्थिती

मागील दशकभरात भारतातील सोने पुनर्वापराचे चित्र लक्षणीय प्रमाणात बदलले आहे. यातील अधिकृत कामे २०१३ मध्ये पाचहूनही कमी होती. तर, २०२१ मध्ये ही संख्या ३३ पर्यंत पोहोचली आहे. परिणामी, देशातील संघटित सोने रिफायनिंग क्षमता २०१३ मधील फक्त ३०० टनांच्या तुलनेत १८०० टनांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. असंघटित क्षेत्रात आणखी ३०० ते ५०० टनांची उलाढाल असली तरी असंघटित क्षेत्रातील रिफायनिंगचे प्रमाण घटले आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रदुषण नियंत्रणाचे नियम सरकारने अधिक कठोर केले आहेत (त्यामुळे स्थानिक पातळीवर सोने वितळवणारी अनेक दुकाने बंद झाली) आणि अधिकाधिक रिटेल चेन स्टोअर्स संघटित रिफायनरीजच्या माध्यमातून जुन्या सोन्याचा पुनर्वापर करत असल्याने हे बदल घडले आहेत.

त्याचप्रमाणे, करलाभांमुळे भारताच्या सोने रिफायनिंग उद्योगाच्या प्रगतीत हातभार लागला आहे. पुनर्वापरातील सोन्याच्या तुलनेत सोन्यावरील अधिक आयात शुल्कामुळे भारतातील संघटित रिफायनिंगची प्रगती झाली आहे. परिणामी, २०१३ मधील फक्त ७ टक्क्यांवरून २०२१ मध्ये एकूण आयातीतील सोन्याचा वाटा २२ टक्क्यांवर पोहोचला.

सोनारांसाठी पुनर्वापर हा पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत

पुनर्वापर हा सोने पुरवठ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. मागील पाच वर्षांत भारतातील सोने पुरवठ्यात जुन्या सोन्याचा वाटा ११ टक्के होता. सोन्याच्या पुनर्वापराचे तीन स्रोत आहेत : दागिने, उत्पादनातील टाकाऊ भाग आणि औद्योगिक टाकाऊ पदार्थांमधील घटक. भारतात जुन्या सोन्याचा पुनर्वापरातील वाटा सर्वाधिक म्हणजेच जवळपास ८५ टक्के आहे. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जुनी सोन्याची बिस्किटे किंवा नाणी जी दागिने घेण्यासाठी विकली जातात किंवा त्याबदल्यात दिली जातात. टाकाऊ सोन्याच्या पुरवठ्यात या घटकाचा वाटा जवळपास १० ते १२ टक्के आहे. कार्यकाळ संपून टाकाऊ झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमधून मिळालेल्या सोन्याचा वाटा भारतातील टाकाऊ सोन्यात ५ टक्क्यांहून कमी आहे.

भारतातील पुनर्वापराला चालना देणारे महत्त्वाचे मुद्दे

पुनर्वापरात भारत जगभरात चौथ्या क्रमांकावर असला तरी भारतात देशातील सोन्याचा पुनर्वापर फारच कमी प्रमाणात म्हणजेच जगभरातील टाकाऊ सोन्याच्या पुरवठ्याच्या तुलनेत फक्त ८ टक्के इतकाच होतो. सध्याच्या सोन्याच्या किमतींमधील बदल, भविष्यातील दरांची वाढ आणि आर्थिक पार्श्वभूमीचा पुनर्वापरावर परिणाम होतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या इकोनोमेट्रिक विश्लेषणनुसार, नजीकच्या भविष्यकाळात किमतीत १ टक्का वाढ झाल्याने पुनर्वापरात ०.६ टक्क्यांनी वाढ होईल. तर त्या उलट, त्यावर्षातील आणि आधीच्या वर्षातील जीडीपीमधील सकारात्मक वाढीमुळे पुनर्वापरात अनुक्रमे ०.३ आणि ०.६ टक्के घट झाली. त्याचप्रमाणे, दागिन्यांच्या मागणीत १ टक्का वाढ झाल्याने पुनर्वापरात ०.१ टक्का घट झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील सोने पुनर्वापरातील अडचणी

या उद्योगाला अधिक सुव्यवस्थापित रचना आणि प्रक्रियांवर आधारित स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी भारतातील सोने पुनर्वापर उद्योग असंघटितच आहे. यामागे तीन मुख्य कारणे आहेत :

  • मान्यताप्राप्त रिफायनरीजना ते टाकाऊ सोने कुठून घेतले जाते त्याचा स्पष्ट स्रोत दाखवावा लागतो. ते रोखीचे व्यवहार न करण्यावर आणि फक्त संघटित सोनार किंवा सराफांसोबतच काम करण्यावर भर देतात. यामुळे, रोखीच्या व्यवहारांना पसंती देणारे छोटे सोनार वेगळे पडतात.
  • अनेक रिफायनरीजतर्फे अतिरिक्त स्क्रॅप कलेक्शन सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. पण अशी केंद्रे फारच कमी आहेत आणि बऱ्याचदा ती मोठ्या शहरांमध्येच दिसतात. परिणामी, टाकाऊ सोने रिफायनरीला पाठवण्यातील अडचणी आणि वेळ स्थानिक पातळीवर सोने वितळवण्याच्या तुलनेत अधिक असतो.
  • सध्याच्या जीएसटी नियमांमुळे ग्राहकांना त्यांनी पूर्वी सोने घेताना दिलेला ३ टक्क्यांचा कर पुन्हा मिळवता येत नाही. जुने सोने विकून रोख खेळते भांडवल मिळवण्यात या मुद्द्याची अडचण ग्राहकांना जाणवत असावी.