INS Arnala: भारतीय नौदलाने बुधवारी विशाखापट्टणम इथल्या नौदल डॉकयार्ड इथे भारताचे पहिले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आयएनएस अर्नाळा त्यांच्या ताफ्यात दाखल केली आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आणि उथळ पाण्यात राहून शत्रूशी सामना करणारी ही पहिली युद्धनौका आहे. संरक्षणप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी आंध्र प्रदेशातील बंदर शहरात या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांच्या उपस्थितीत ही नौका अधिकृतपणे नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. ही नौदल युद्धनौका देशाच्या किनारपट्टीवरील संरक्षणक्षमता वाढवेल. ही पाणबुडीविरुद्ध युद्धात कमी खोली असलेल्या पाण्यात वापरल्या जाणाऱ्या युद्धनौका मालिकेतील (Anti-Submarine Warfare Shallow Water Craft) पहिली युद्धनौका आहे.
भारताला मिळाली नवीन युद्धनौका
आयएनएस अर्नाळाची लांबी ७७.६ मीटर आहे. ही युद्धनौका गार्डनर रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स कोलकाता यांनी लार्सन अँड टुब्रोसोबत सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत डिझाइन करून घडवली आहे. INS-Arnala ही डिझेल इंजिन वॉटरजेट प्रोपल्शन सिस्टिमद्वारे चालवली जाणारी सर्वात मोठी भारतीय युद्धनौका आहे. यामध्ये उथळ पाण्यात वेग आणि हालचाली वाढवण्याची क्षमता आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, नौदल युद्धनौका पाण्याखालील देखरेख, शोध आणि बचाव कार्य तसंच कमी तीव्रतेच्या सागरी ऑपरेशन्ससाठी तयार करण्यात आली आहे.
द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, अर्नाळा ही जहाजबांधणी कंपनीने डिझाइन केलेली आणि बांधलेली पहिली भारतीय नौदल युद्धनौका आहे. ही नौदलाच्या इतर नौकांच्या नेहमीच्या डिझाइनपेक्षा वेगळी आहे. या जहाजात ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर केला आहे. ही युद्धनौका सरकारच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाला आणखी बळकटी देणारी आहे. एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसीमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एल अँड टी, महिंद्रा डिफेन्स आणि एमईआयएलसारख्या भारतीय संरक्षण कंपन्यांच्या प्रगत प्रणाली एकत्र केल्या आहेत. अर्नाळा ही नौदलाच्या जुन्या होत चाललेल्या अभय-क्लास कॉर्वेट्सची जागा घेईल. ही GRSE (Garden Reach Shipbuilders & Engineers)द्वारे बांधल्या जाणाऱ्या आठ एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसीच्या मालिकेतील पहिलीच युद्धनौका आहे. उर्वरित आठ एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी मालिकेतील जहाजे कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीद्वारे डिझाइन करून तयार केली जातील. एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी मालिकेतील दुसरे जहाज वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित केले जाण्याची शक्यता आहे. कालांतराने नौदल भारतातील १६ प्रमुख बंदरांचे संरक्षण करण्यासाठी अशा एकूण १६ नौका तैनात करेल.
आयएनएस अर्नाळा
- सागरी क्षेत्रात पाण्याखालील टेहळणी, शोध व बचाव मोहिमा, तसेच कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांसाठी सज्ज
- युद्धनौकेची लांबी ७७.६ मीटर
- १४९० टनांपेक्षा जास्त वजनाचे
- पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आणि उथळ पाण्यात राहून शत्रूशी सामना करणारी ही पहिली युद्धनौका
- नौका डिझेल इंजिन अन् वॉटरजेट तंत्रज्ञानाच्या संयोगाने चालणारी भारतीय नौदलातील सर्वात मोठी युद्धनौका
आयएनएस अर्नाळा कार्यान्वित करणे हा भारतीय नौदलासाठी एक मोठा टप्पा आहे. ही युद्धनौका भारताच्या किनारी संरक्षणात वाढ करत पाणबुडी हल्ल्यांपासून संरक्षण करेल. पाणबुडीविरोधी युद्धात मुख्य भूमिकेव्यतिरिक्त अर्नाळाकडे पाण्याखालील प्रगत देखरेख प्रणाली आणि खाणकाम अशा क्षमता आहेत. उथळ पाण्यातही त्या ऑपरेशन्स राबवू शकतात. “प्रभावी टॉर्पेडो फायरिंग पोझिशन्स मिळवण्यासाठी शत्रूच्या पाणबुड्यांना ५० ते ६० मीटर खोलीच्या किनारी भागात नेव्हिगेट करण्याची आवश्यकता असते. अर्नाळा स्टँड ऑफ रेंजवर अशा धोक्यांचा शोध घेण्यासाठी ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी डिझाइन केलेली आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या आव्हानांना लक्षात घेऊन हिंद महासागर क्षेत्रात भारताची देखरेख आणि प्रतिसाद क्षमता मजबूत होईल.
आयएनएस अर्नाळाचे कार्य काय?
अर्नाळाचे काम पाणबुडीविरोधी युद्ध मोहिमा राबवणे असेल. ते किनारी सुरक्षा आणि देखरेख करेल. ते गुप्तचर, देखरेख आणि शोधकार्य करेल. ते शोध आणि बचाव मोहिमांमध्येदेखील वापरले जाऊ शकतात. अर्नाळाची शत्रूवर मारा करण्याची क्षमता ३३०० किलोमीटर इतकी आहे. या युद्धनौकेवर सात अधिकाऱ्यांसह ५७ नौदल कर्मचारी तैनात करण्याची क्षमता आहे. ही युद्धनौका एएसडब्ल्यू कॉम्बॅट सूटने सुसज्ज आहे. ते शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सक्षम असेल आणि त्यांच्यावर नजर ठेवू शकेल. अर्नाळामध्ये चार प्रकारच्या व्यवस्थापन प्रणालीदेखील बसवण्यात आल्या आहेत. या व्यवस्थापन प्रणाली युद्धादरम्यान युद्धनौका सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.
आयएनएस अर्नाळाची वैशिष्ट्ये
अर्नाळा हे १४९० टनांपेक्षा जास्त वजनाचे आहे. या युद्धनौकेची लांबी ७७.६ मीटर आहे. नौका तयार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या सामग्रीतील ८० टक्क्यांहून अधिक साहित्य स्वदेशी आहे. त्यामध्ये अत्याधुनिक डिझेल इंजिन वॉटरजेट बसवण्यात आले आहे. रचनेच्या बाबतीत अर्नाळा भारतीय नौदलातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. ती किनारी भागात आणि उथळ पाण्याच्या भागात प्रभावीपणे काम करते. अर्नाळा नौकेच्या वरच्या भागावर एक सर्पिलाकार शंख आहे. हे शंखाचे चिन्ह भारतीय सांस्कृतिक मूल्ये आणि सागरी शक्तीचे प्रतीक आहे. आयएनएस अर्नाळामध्ये रडार आणि सोनार सिस्टिम बसवण्यात आल्या आहेत. हे अत्याधुनिक अँटी-सबमरीन सेन्सर्स आहेत. ते सर्व हवामान परिस्थितीत दिवस-रात्र काम करण्यास सक्षम आहेत. या सेन्सर्सद्वारे समुद्रात असलेल्या पाणबुडीला दुरूनच ओळखणे शक्य आहे. तसंच याद्वारे शत्रूच्या पाणबुड्या समुद्रातच पुरता येऊ शकतात.
महाराष्ट्रातील वसईमधील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून या युद्धनौकेचे नाव देण्यात आले आहे. ते भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतिबिंब आहे. नौदलाने सांगितले की, हा किल्ला १७३७ मध्ये चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बांधला होता. वैतरणा नदीच्या रक्षणासाठी हा किल्ला मोक्याच्या ठिकाणी होता आणि उत्तर कोकण किनाऱ्यावर पहारेकरी म्हणून काम करत होता. अर्नाळा हा शब्द ‘अरणवे शौर्यम’ या शब्दावरून आला आहे, याचा अर्थ समुद्रातील शौर्य असा होतो