‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताच्या मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेनंतर भारतीय हवाई दलाने पत्रकार परिषद घेत या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानमधील किराना हिल्सचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर हा परिसर चर्चेत आला आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. तसेच त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यालादेखील भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने सीमेपलीकडून पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हवाई हल्ले केले.

तीन तासांत भारतीय हवाई दलाने ११ पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तान हवाई दलाला आधार देणाऱ्या सुमारे २० टक्के पायाभूत सुविधा नष्ट केल्याची माहिती आहे. पाकिस्तानातील उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणांची छायाचित्रे आणि लष्करी माहिती सोशल मीडियावर पसरत असताना, भारताने पाकिस्तानच्या अणवस्त्रांचा साठा असलेल्या किराना हिल्सला लक्ष्य केल्याची बातमी पसरू लागली. त्यावर पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाने आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी काय म्हटले? किराना हिल्स काय आहे? पाकिस्तानने तिथे काय लपवले आहे? त्याविषयी जाणून घेऊ…

भारतीय सशस्त्र दलाने पत्रकार परिषदेत पाकिस्तानमधील किराना हिल्सविषयी सुरू असलेल्या चर्चेवर आपली भूमिका मांडली. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

किराना हिल्स काय आहे?

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सरगोधा जिल्ह्यात असणारे किराना हिल्स हा लष्करी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांमध्ये बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय राहिला आहे. किराना हिल्सला ‘पाकिस्तानचे क्षेत्र ५१’ म्हणून ओळखले जाते. या भागात खडकाळ टेकड्या असून, तेथे १९८० च्या दशकात बांधलेले भूमिगत बोगदे आणि अनेक भक्कम खंदक असल्याचे म्हटले जाते. किराना हिल्समध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्र शस्त्रागारातील वॉरहेड्स, डिलिव्हरी सिस्टीम व संवेदनशील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असल्याचेदेखील सांगितले जाते. मात्र, पाकिस्तान या जागेच्या खऱ्या स्वरूपाविषयी कधी बोललेला नाही. परंतु, याच ठिकाणी पाकिस्तानचे अण्वस्त्र भांडार असल्याचे बोलले जाते. किराना हिल्समध्ये १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून अणवस्त्रांचा साठा असल्याचे मानले जाते.

किराना हिल्सविषयी विविध स्वरूपाची माहिती पसरत असताना भारतीय हवाई दलाने यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एअर मार्शल ए. के. भारती यांनी सोमवारी (१२ मे) पत्रकार परिषदेत माहिती देताना स्पष्ट केले आणि म्हटले, “आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही.” पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “पाकिस्तानने किराना हिल्सवर आपली अण्वस्त्रे साठवली आहेत हे आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद! आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही. आम्ही तुम्हाला माहिती दिलेल्या लक्ष्यांच्या यादीत या ठिकाणाचा समावेश नव्हता. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, अनौपचारिकरीत्या असले तरी किराना हिल्स पाकिस्तानच्या आण्विक पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे केंद्र आहे आणि दुसरे म्हणजे भारताने क्षमता असूनही जाणीवपूर्वक या ठिकाणाला लक्ष्य करण्याचे टाळले.

परंतु, सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात किराना साइटला लक्ष्य करण्यात आले होते आणि त्यामुळे भूमिगत हादरे बसले होते. काहींनी तर हे हादरे आण्विक सुविधेतील नुकसानाशी संबंधित असल्याचे म्हटले. फ्लाइट ट्रॅकिंग करणाऱ्यांना पाकिस्तानी हवाई क्षेत्रात अणु आपत्कालीन प्रतिसादाकरिता प्रसिद्ध असलेले अमेरिकन विमान ‘B350 AMS’ आढळून आले. त्यानंतर या चर्चेने जोर धरला. पाकिस्तान किंवा अमेरिकेने विमानाच्या उपस्थितीवर कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानातील संरक्षण अधिकाऱ्यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आणि म्हटले की, त्यांच्या कोणत्याही आण्विक पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले नाही. परंतु, त्यांनी किराना हिल्सच्या स्वरूपाबद्दल मौन बाळगल्याने या परिसराच्या चर्चेने आणखीनच जोर धरला.

“भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीरीत्या पार पाडलं आहे. सर्व निवडक उद्दिष्टं साध्य केली आहेत. सर्व भारतीय वैमानिक सुरक्षितपणे परतले. मी एवढंच म्हणू शकतो की, आम्ही निवडलेलं आमचं उद्दिष्ट साध्य केलं आहे आणि आमचे सर्व वैमानिक परतले. तसेच भारतीय हवाई दलानं शत्रूच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखत अनेक पाकिस्तानी विमानं पाडली,” असे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले.

“आमची लढाई दहशतवादी आणि त्यांच्या पायाभूत सुविधांशी होती; पाकिस्तानी सैन्याशी नाही. परंतु, पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करून दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला हे खेदजनक आहे, ज्यामुळे आम्हालाही त्याच प्रकारे प्रत्युत्तर द्यावे लागले,” असे त्यांनी पुढे सांगितले. पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाने तुर्कीच्या सोंगर ड्रोनचे अवशेष आणि चिनी बनावटीच्या पीएल-१५ क्षेपणास्त्राच्या अवशेषांचे छायाचित्र दाखवले. या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानने भारतातील नागरी वस्त्या आणि लष्करी ठिकाणांवर हल्ला केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी सांगितले, भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले तर पाकिस्तानी लष्कराने आपल्या नागरिकांवर आणि लष्कराच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने लाहोर आणि गुजरांवाला जवळच्या रडार यंत्रणेवर हल्ला केला. एके भारती म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या महत्त्वांच्या लष्करी मालमत्तांवर हल्ला केला, ज्यात पश्चिमी आघाडीवरील एअर बेस, कमांड सेंटर्स, लष्करी पायाभूत सुविधा आणि एअर डिफेन्स सिस्टम्स यांचा समावेश होता.