भारत आणि पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. या तणावात एकूणच पाकिस्तानची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, या तणावादरम्यान भारताचे तालिबानशी संबंध मजबूत होत असल्याचे चित्र आहे, ज्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढणार ही नक्की. भारत-पाक संघर्षादरम्यान भारताचे तुर्कियेशी संबंध बिघडले आहेत. या तणावात तुर्कियेने पाकिस्तानला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, याचदरम्यान भारत आणि तालिबान यांच्यातील जवळीक वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी अधिकृत फोन कॉलवर चर्चा केली. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने काबूलमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर पहिल्यांदाच अशा स्वरूपाची चर्चा झाली आहे. परंतु, जयशंकर यांनी तालिबान मंत्र्यांशी काय चर्चा केली? भारत आणि अफगाणिस्तानमधील विकसित होत असलेल्या संबंधांमध्ये हा फोन कॉल महत्त्वाचा का मानला जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

परराष्ट्र मंत्र्यांचा तालिबान मंत्र्यांशी फोनवर संवाद
१५ मे रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मुख्य म्हणजे भारताने अद्याप पाकिस्तानमधील तालिबान प्रशासनाला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. तालिबान राजवटीकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता, त्याच्या काही दिवसांतच ही चर्चा झाली आहे. फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती देताना एस. जयशंकर यांनी लिहिले, “आज संध्याकाळी कार्यवाहक अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मवलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, चर्चेदरम्यान त्यांनी अफगाणिस्तानातील लोकांशी असणारी भारताची पारंपरिक मैत्री आणि त्यांच्या विकासाच्या गरजांना सतत पाठिंबा देण्यावर भर दिला. त्यांनी दोन्ही देशांतील सहकार्य पुढे नेण्याचे मार्ग आणि माध्यमांवर चर्चा केली.”
जयशंकर यांनी लिहिले की, अलीकडील खोट्या आणि निराधार वृत्तांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांनादेखील मुत्ताकी यांनी ठामपणे नकार दिल्याचे सांगितले. पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, भारताने अफगाणिस्तानच्या भूमीवर क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले केले आहेत. मुख्य म्हणजे जयशंकर यांनी या संभाषणात पहलगाम हल्ला किंवा भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावाचा उल्लेख झाल्याचे स्पष्ट केले नाही.
त्याऐवजी या संवादात अफगाणिस्तान आणि भारताच्या संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयातील सार्वजनिक संवाद संचालक हाफिज झिया अहमद म्हणाले की, मुत्ताकी यांनी डॉ. जयशंकर यांना अफगाण नागरिकांना विशेषतः वैद्यकीय मदत घेणाऱ्या नागरिकांसाठी अधिक व्हिसा जारी करण्यास सांगितले. त्यांनी द्विपक्षीय व्यापार, भारतीय तुरुंगात असलेल्या अफगाण कैद्यांची सुटका आणि इराणमधील चाबहार बंदराचा विकास यावरदेखील चर्चा केली.
भारत-तालिबानची जवळीकता वाढत आहे का?
२०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले, मात्र अद्याप भारत सरकारने त्यांना अधिकृत मान्यता दिलेली नाही. परंतु, भारत सातत्याने तालिबानशी संवाद साधत असल्याचे चित्र आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्रालयांचे संयुक्त सचिव जे. पी. सिंह यांनी दोनदा अफगाणिस्तानला भेट दिली. त्यांनी एकदा मार्चमध्ये मुत्ताकी यांची भेट घेतली आणि नंतर नोव्हेंबरमध्ये कार्यवाहक संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांची भेट घेतली. तसेच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या जानेवारीत दुबईमध्ये अमीर खान मुत्तकी यांच्याबरोबर झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत वरिष्ठ भारतीय राजदूतांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

तालिबान सरकारनेदेखील भारताशी राजकीय आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यात रस दर्शविला आहे आणि भारताशी संबंध मजबूत करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. यंदा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेली चर्चा व्यापार वाढवण्यावर आणि इराणच्या चाबहार बंदराच्या विकासावर केंद्रित असल्याची माहिती आहे. भारत पाकिस्तानच्या कराची आणि ग्वादर बंदरांना बायपास करण्यासाठी चाबहार बंदर विकसित करत आहे. अमेरिकन थिंक-टँक विल्सन सेंटरचे मायकेल कुगेलमन यांनी ‘बीबीसी’ला सांगितले होते की, “भारताकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे. या देशाचे कधीही तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध नव्हते, त्यामुळे हे अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. हा तालिबानसाठी राजनैतिक विजय आहे.”
एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात दिल्लीने परराष्ट्र मंत्रालयातील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणचे प्रभारी संयुक्त सचिव एम. आनंद प्रकाश यांना काबूलला पाठवले होते. विशेष म्हणजे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. परंतु, यंदा मुत्ताकी यांच्याशी झालेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित झाला की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेदेखील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते अब्दुल काहार बल्खी म्हणाले, “अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध करते आणि शोकग्रस्त कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करते.”
तालिबानशी संवाद साधण्यामागील कारण काय?
भारताचे अफगाणिस्तानशी धोरणात्मक संबंध आहेत. अनेक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तालिबानशी संवाद साधून भारत पाकिस्तानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘द डिप्लोमॅट’च्या माहिती प्रमाणे, जर भारताने तालिबानशी संवाद साधला तर भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रवाह रोखण्यास मदत होऊ शकते. पाकिस्तानमधील भारताचे माजी राजदूत अजय बिसारिया स्पष्ट करतात की, तालिबानशी संवाद साधून भारत असा करार करण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तानची भूमी भारताच्या विरोधातील कारवायांसाठी वापरली जाणार नाही. त्या बदल्यात अफगाणिस्तानला मर्यादित सहभाग आणि मानवतावादी मदत देईल. या संवादाच्या उद्देशामध्ये चीनचा घटकदेखील आहे. अफगाणिस्तानातील तज्ज्ञ शांती मॅरिएट डिसोझा यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले, “ऑगस्ट २०२१ पासून चीनने आपली उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढवलेल्या प्रदेशात भारत आपला प्रभाव वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते.”