Was Kannada born out of Tamil?: येत्या ५ जून रोजी कमल हासन यांचा ‘Thug Life’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या निमित्ताने एका कार्यक्रमात कन्नड ही तमिळ भाषेतून जन्मलेली आहे, असे वक्तव्य कमल हासन यांनी केले. त्यानंतर कन्नड विरुद्ध तमिळ या भाषिक वादाला चांगलीच वाचा फुटली. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका कार्यक्रमात कमल हासन यांनी कन्नड अभिनेते शिवराजकुमार यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केलं होतं. खरंतर, हासन यांनी हे वक्तव्यं प्रेमाने केल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, त्यानंतर निर्माण झालेल्या वादंगामुळे कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला का? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणारं आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा. 

कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला होता का?

कन्नड ही सर्वात प्राचीन द्रविड भाषांपैकी एक असून या भाषेचा इतिहास सुमारे २,००० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. या भाषेचा इतिहास सांगणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. या भाषेचा समावेश द्रविड भाषाकुटुंबाच्या दक्षिण शाखेत होतो. याच शाखेत तमिळ, मल्याळम आणि तेलुगू यांचाही समावेश होतो. कन्नड भाषेचा उगम प्रोटो-द्रविड या काल्पनिक परंतु, सर्व द्रविड भाषांचा मूळ स्रोत मानल्या जाणाऱ्या भाषेतून इ.स.पू. ३ ऱ्या शतकात झाल्याचे मत भाषातज्ज्ञ व्यक्त करतात. सध्या हलमिडी हा सर्वात प्राचीन कन्नड शिलालेख मानला जातो. या शिलालेखाचा कालखंड इ.स. ४५० असा आहे. कर्नाटकात सापडलेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये (इ.स.पू. ३ रे शतक) द्रविड मूळ असलेले शब्द दिसून येतात. यावरून कन्नड ही भाषा त्याही आधी बोलली जात होती असे सूचित होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

 Halmidi inscription

कन्नड आणि तमिळ या दोन भाषांमधील संबंध 

कन्नड आणि तमिळ या दोन्ही भाषांचा उगम प्रोटो-द्रविड या समान मूळ भाषेतून झाला आहे. या दोन्ही भाषांचे मूळ एकच असल्याने दोन्ही भाषांमध्ये बरेच साम्य आढळते. तमिळ भाषा भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तमिळकम या प्रदेशात बोलली गेली, तर कन्नड भाषिक लोक पश्चिमेकडे स्थलांतरित झाले आणि आजच्या कर्नाटकात त्यांनी वस्ती केली. त्यामुळे कन्नड भाषेचा स्वतंत्र भाषिक विकास झाला आहे. या दोन्ही भाषांना एकत्रित राजकीय इतिहासही लाभला आहे. चालुक्य, पल्लव आणि होयसळ यांसारख्या ऐतिहासिक राजवटींनी कन्नड व तमिळ भाषिक प्रदेशांवर शासन केले होते.

चोल राजवंशाने (इ.स. ९ व्या ते १३ व्या शतकात) कर्नाटकमधील काही भागांवर राज्य केलं, त्यामुळे तिथे तमिळ शिलालेख सापडतात. त्याचप्रमाणे होयसळ राजवटीने (इ.स. १० व्या ते १४ व्या शतकात) तमिळ भाषिक प्रदेशांवर प्रभाव टाकला आणि त्यामुळे भाषिक देवाण-घेवाण घडून आली. विजयनगर साम्राज्यात (इ.स. १४ व्या ते १७ व्या शतकात) राजदरबारात एकाच वेळी कन्नड आणि तमिळ साहित्याची जोपासना झाली. दरबारी कवी आणि विद्वान बहुधा दोन्ही भाषा बोलत असतं. त्यामुळे राजदरबारात आणि मंदिरात या भाषा संवादासाठी केंद्रस्थानी होत्या. कांचीपुरम किंवा बेलूर-हळेबिडू येथील मंदिरे याचे उत्तम उदाहरण असून तिथे कन्नड आणि तमिळ दोन्ही भाषांतील शिलालेख आढळतात. साहित्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, तमिळची संगमकालीन परंपरा (इ.स.पू. ५०० -इ.स. ३००) आणि कन्नडच्या शास्त्रीय कालखंडाची सुरुवात (सुमारे इ.स. ८५० पासून) वेगवेगळ्या कालखंडात झाली असली तरी या दोन्ही भाषांवर द्रविड संस्कृतीतील सामायिक मूल्यांचा प्रभाव होता. भक्ती आंदोलनाच्या कालखंडात  विशेषतः शैव संप्रदायात कन्नड कवी बसवण्णा आणि तमिळ संत अप्पर व मणिक्कवाचार यांच्यात एक प्रकारचं अध्यात्मिक ऐक्य दिसून येतं. त्यांनी एकत्रितरित्या लोकभाषांमध्ये भक्तीचा प्रसार केला. दोन्ही भाषांमध्ये व्याकरणात समानता आढळते. 

तमिळ भाषेचा उगम कसा झाला?

तमिळ ही जगातील सर्वात प्राचीन आणि आजही वापरात असलेली भाषा मानली जाते. तिचा इतिहास २,५०० वर्षांहून अधिक जुना आहे आणि ती द्रविड भाषाकुटुंबाचा एक भाग आहे.  भारतात आर्यपूर्व काळात द्रविड भाषा बोलल्या जात होत्या आणि नंतर आर्य भाषिकांनी (संस्कृत व तत्सम भाषांसह) भारतात आगमन केले, असे काही भाषातज्ज्ञ मानतात. तमिळ ही दक्षिण द्रविड उपशाखेतील भाषा असून तिचा उगम प्रोटो-द्रविड या आदिम भाषेतून झाला. ही भाषा अंदाजे इ.स.पू. २५०० ते १५०० दरम्यान दक्षिण भारतात बोलली जात होती. सुमारे इ.स.पू. १००० पर्यंत तमिळ ही स्वतंत्र भाषेप्रमाणे विकसित होऊ लागली. तमिळ भाषेचा सर्वात प्राचीन पुरावा संगम साहित्यामध्ये आढळतो. संगमकालीन ग्रंथ हे प्राचीन तमिळकम प्रदेशातील (आधुनिक तामिळनाडू व केरळचा काही भाग) पांड्य, चेरा आणि चोल राजघराण्यांच्या आश्रयाने रचले गेले. कालांतराने तमिळ भाषेचा विकास ‘शास्त्रीय तमिळ’ (Classical Tamil) म्हणून झाला. ही भाषा धार्मिक आणि तात्त्विक ग्रंथांमध्ये वापरली जाई.

भक्ती चळवळ आणि  तमिळ भाषा 

इ.स. ६ व्या ते ९ व्या शतकातील भक्ती चळवळीमुळे नयनार आणि आळवार संतांनी भगवान शिव व विष्णूच्या भक्तीतील काव्यरचना साहित्यात आणल्या. त्यामुळे तमिळमध्ये भक्तिपर साहित्याची परंपरा निर्माण झाली. तमिळ ही भाषा शैव सिद्धांत आणि वैष्णव तत्त्वज्ञानाची मूळ भाषा ठरली असून तिने अनेकदा वैदिक व संस्कृतप्रधान वर्चस्वाला विरोध दर्शवला.

मध्ययुगात, विशेषतः राजराज चोल आणि राजेन्द्र चोल यांच्या काळात, चोल सम्राटांनी तमिळ शिलालेख, मंदिर स्थापत्य आणि साहित्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. चोलांच्या नौदल मोहिमेद्वारे तमिळ भाषेचा प्रसार श्रीलंका, आग्नेय आशिया (विशेषतः थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया) आणि उत्तरी श्रीलंकेच्या काही भागांपर्यंत झाला. तिथे ही भाषा आजही बोलली जाते. ब्रिटिश राजवटीत तमिळचा उपयोग छापील शब्दकोशांमध्ये करण्यात आला आणि काही इंग्रजी शब्दही तमिळमध्ये सामावले गेले.

Tirukkuṟaḷ palm leaf manuscript

हिंदीविरोधी आंदोलनांचा केंद्रबिंदू

२० व्या शतकात, तमिळ ही द्रविड चळवळीचा आणि विशेषतः हिंदीविरोधी आंदोलनांचा केंद्रबिंदू ठरली. २००४ साली तमिळला भारतातील ‘शास्त्रीय भाषा’ (Classical Language) म्हणून घोषित करण्यात आले आणि ही मान्यता मिळवणारी तमिळ पहिली भारतीय भाषा ठरली.

कमल हासन यांच्या वक्तव्यावर टीका

कमल हासन यांच्या कन्नड भाषेविषयीच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असून कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र हे या टीकाकारांमध्ये आघाडीवर आहेत. त्यांनी हासन यांच्यावर कन्नड भाषेचा अपमान केल्याचा आणि गर्विष्ठपणा दाखवल्याचा आरोप केला. आपल्या मातृभाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषेला कमी लेखणं हे योग्य नाही. तसेच, हासन हे भाषातज्ज्ञ नाहीत त्यामुळे भाषांच्या उगमाविषयीचे दावे करणं त्यांनी टाळावं, असं त्यांनी स्पष्ट केलं. पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्त अधिकारी टी. व्ही. मोहनदास पै यांनीही हासन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी हे विधान “मूर्खपणाचं आणि अनावश्यक” असल्याचं म्हटलं. “अशा उथळ टिप्पणी करून मतभेद का निर्माण करायचे? कन्नड ही एक स्वतंत्र आणि समृद्ध शास्त्रीय भाषा आहे, जशी तमिळ आहे. दोन्ही भाषांचा सन्मान झाला पाहिजे, असा अपमान नव्हे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कर्नाटक रक्षण वेदिकेचे (प्रवीण शेट्टी गट)  अध्यक्ष प्रवीण शेट्टी यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकर्त्यांनी हासन यांना कार्यक्रमात गाठण्याआधीच ते तिथून निघून गेले. त्यांनी हासन यांना इशारा दिला की, जर त्यांना कर्नाटकात आपले चित्रपट प्रदर्शित करायचे असतील किंवा व्यवसाय करायचा असेल, तर सर्वात आधी त्यांनी कन्नड भाषा आणि कन्नडजनांचा अपमान करणं थांबवावं.