कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. येत्या १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानोत्तर चाण्यांमध्ये येथे काँग्रेसची सरशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने अहोरात्र मेहनत घेतली होती. त्याचे फळ त्यांना मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. कारण या निवडणुकीच्या निकालावरच आगामी लोकसभा निवडणुकीचे गणित ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक काँग्रेससाठी का महत्त्वाची आहे? हे जाणून घेऊ या…

कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थिती राहण्याची शक्यता?

कर्नाटकमध्ये एकूण २२४ जागांसाठी मतदान झाले. येथे भाजपाकडून, आमची सत्ता कायम राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काँग्रेसचा भाजपापेक्षा जास्त जागांवर विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थिती राहील, असे सांगण्यात आले आहे. तर, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत होईल, असे काही जाणकार सांगत आहेत.

congress bjp manifesto climate change
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
prakash javadekar kerala lok sabha marathi news
केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?

हेही वाचा >> प्रशासकीय अधिकार सरकारकडेच! सुप्रीम कोर्टाचा निकाल; दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल वाद नेमका काय? जाणून घ्या…

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काय सांगण्यात आले आहे?

‘न्यूज १८’ च्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसला ९९ ते १०९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाचा ८८ ते ९८ जागांवर विजय होऊ शकतो. धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षाला २१ ते २६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला १०५ जागा मिळतील. तर भाजपाचा ८५ जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाला ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांचा दोन जागांवर विजय होऊ शकतो.

बहुमतासाठी ११३ जागांवर विजय मिळवणे आवश्यक

२०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपाचा १०४ जागांवर विजय झाला होता. तर काँग्रेसने ८० जागांवर विजय मिळवला होता. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ३८ उमेदवार निवडून आले होते. बहुमतासाठी कर्नाटकमध्ये एकूण ११३ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसचा ११० ते १२२ जागांवर विजय होऊ शकतो. भाजपाला ७३ ते ८५ जागा मिळू शकतात. तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचा २१ ते २९ जागांवर विजय होऊ शकतो. या सर्वेक्षणानुसार काँग्रेस कर्नाटकमधील सहापैकी एकूण पाच भागांत चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. तर सीमेलगतच्या भागात भाजपाला जनाधार मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Maharashtra crisis : नबाम रेबिया प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे का पाठविले गेले?

काँग्रेससाठी कर्नाटकचा विजय का महत्त्वाचा?

आगामी वर्षात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या राज्यांतील विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे कर्नाटकमधील निवडणुकीला महत्त्व आलेले आहे. २०१४ सालापासून अनेक निवडणुकांत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. असे असताना कर्नाटकमधील विजय काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण करू शकतो. याच कारणामुळे कर्नाटकची विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे.

२०१४ सालापासून अनेक निवडणुकांत काँग्रेसचा पराभव

काँग्रेस पक्षाचा पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत ‘आप’चा विजय झाल्यामुळे येथील काँग्रेसची सत्ता गेली. २०२२ साली काँग्रेसचा हिमाचल प्रदेशमध्ये विजय झाला. काँग्रेसला काही प्रमाणात दिलासा देणारा हा एकमेव विजय आहे. गुजरातमध्येही काँग्रेसला फक्त १७ जागांवर विजय मिळवता आलेला आहे. तर दुसरीकडे या राज्यात भाजपाने एकहाती सत्ता मिळवलेली आहे. त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. असे असताना कर्नाटकमधील विजय काँग्रेससाठी ‘बुस्टर डोस’ ठरू शकतो.

हेही वाचा >> तुर्कस्तानमधील निवडणुकीत कुणाचे पारडे जड? एर्दोगन यांची दशकभराची सत्ता संपुष्टात येणार?

विजय झाल्यास काँग्रेसमधील सामर्थ्य समोर येणार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवासाठी विरोधक आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. काँग्रेस या संभाव्य आघाडीचे नेतृत्व करू पाहत आहे. विरोधी पक्षांचे नेतृत्व करायचे असेल तर काँग्रेसला स्वत:ची कुवत दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसला कर्नाटकमध्ये विजय मिळवावा लागेल. या निवडणुकीतील विजयाच्या रूपाने विरोधकांना काँग्रेसमधील सामर्थ्य दिसेल. त्यानंतर कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांचे नेतृत्व काँग्रेसकडे येऊ शकते. याच कारणामुळे काँग्रेसला कर्नाटकमधील विजय महत्त्वाचा आहे.

अन्य राज्यांत चांगली कामगिरी करण्यासाठी विजय महत्त्वाचा

या वर्षात कर्नाटकनंतर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड अशा महत्त्वाच्या राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या राज्यांत चांगली कामगिरी करायची असेल तर काँग्रेसला कर्नाटकमध्ये विजय मिळवून दाखवावा लागणार आहे. या विजयामुळे अन्य राज्यांतील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारू शकतो. दुसरीकडे कर्नाटक हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे राज्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यात काँग्रेसचा विजय होणे सध्या काळाची गरज आहे. या विजयामुळे खरगे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होऊ शकते. याच कारणामुळे काँग्रेसला कर्नाटकची निवडणूक जिंकणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>विश्लेषण: अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते? 

विरोधकांचे नेतृत्व करण्यासाठी विजय महत्त्वाचा

दुसरीकडे आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या संभाव्य आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती यांसारखे पक्ष उत्सुक आहेत. या पक्षांकडून काँग्रेसला विरोध केला जातो. असे असताना कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यास सध्या विरोध करणारे पक्ष काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारू शकतात. दरम्यान येत्या १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.