ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यातून झालेल्या संघर्षात लाहोर, रावळपिंडी या मोठ्या शहरांपर्यंत भारतीय क्षेपणास्त्रे पोहोचली. ही नामुष्की झाकण्यासाठीच पाकिस्तानी लष्करप्रमुखांना फील्ड मार्शल म्हणून बढती मिळाली का?
फील्ड मार्शल, तरी लष्करप्रमुखच?
जनरल असिम मुनीर सध्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख आहेत. शाहबाझ शरीफ सरकारने त्यांना २० मे रोजी बढती देऊन फील्ड मार्शल हा हुद्दा बहाल केला. ब्रिटिश परंपरेतील लष्करी व्यवस्थेत फील्ड मार्शल हा सर्वोच्च हुद्दा मानला जातो. भारतात फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ आणि फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांना हा बहुमान प्राप्त झाला होता. पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख आणि पुढे त्या देशाचे हुकूमशहा बनलेले आयुब खान हेही फील्ड मार्शल होते. ब्रिटिश परंपरेनुसार फील्ड मार्शल हा हुद्दा तहहयात असला, तरी अशी व्यक्ती सैन्यदलात सक्रिय नसते. मुनीर यांच्या बाबतीत अपवाद म्हणजे, ते यापुढेही (२०२७पर्यंत) पाकिस्तानचे लष्कप्रमुख असतील!
‘ऑपरेशन सिंदूर’
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला ‘दि रेझिस्टन्स फोर्स’ या तुलनेने नवीन दहशतवादी संघटनेने घडवून आणल्याचे पुरावे मिळाले. ही संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्याच पुढाकाराने स्थापन झाली. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जरब बसावी या हेतूने भारताने ७ मे रोजी पहाटे १.०५ ते १.३० या काळात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्यवेधी हल्ले केले. यात दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे, त्यांच्या म्होरक्यांची निवासस्थाने उद्ध्वस्त झाली. यांतील चार ठिकाणे पाकिस्तानच्या पंजाबमधील होती. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतीय लष्करी आस्थापना आणि नागरी वस्त्या, तसेच धार्मिक स्थळांना लक्ष्य केले आणि ऑपरेशन सिंदूरची व्याप्ती वाढली.
बहुमान कशाबद्दल?

पाकिस्तान सरकारच्या निवेदनात म्हटले आहे, की ‘भारताशी झालेल्या संघर्षात पाकिस्तानच्या भूमीचे रक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी जनरल असिम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्यदलांनी पार पाडली. ‘या कामगिरीबद्दल जनरल असिम मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढती देण्यात येत आहे.’ ‘शत्रू’ला पराभूत केले असेही निवेदनात नमूद आहे, अर्थात तपशील उपलब्ध नाही.

नामुष्कीजनक कामगिरी

भारताने १९७१ नंतर प्रथमच पंजाब या पाकिस्तानातील सर्वांत महत्त्वाच्या राज्यावर हवाई हल्ले केले. पाकिस्तानी लष्कर, राजकारण, प्रशासन यात पंजाबी टक्का नेहमीच प्रभावी राहिला. पंतप्रधान शाहबाझ शरीफ, लष्करप्रमुख असिम मुनीर पंजाबचेच. पंजाबमधील जिहादी तळ उद्ध्वस्त करून भारताने तेथील लष्कर-जिहादी संबंधांनाही धक्का दिला. पुढे संघर्ष पेटला त्यावेळी चकलाला येथील नूर खान हवाई तळावर भारताने केलेला हल्ला विशेष दखलपात्र ठरला. चकलाला हे ठिकाण पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीजवळ येते. या दोन्ही हल्ल्यांमुळे जनरल मुनीर यांची प्रतिमा ढासळल्याचे संकेत मिळत होते. मुळात पहलगाम हल्लाही त्यांच्याच प्रक्षोभक वक्तव्यातून घडून आला, असे स्पष्ट होत आहे. अलीकडच्या कोणत्याही पाकिस्तानी लष्करप्रमुखाला अशा प्रकारे नामुष्कीचा सामना करावा लागला नव्हता. भारताशी संघर्ष करण्याची खुमखुमी जनरल मुनीर यांच्या अंगाशी आले असे सामरिक विश्लेषकांना वाटते.

जिहादी जनरल आणि खिळखिळे सरकार

असिम मुनीर यांची ओळख ‘जिहादी जनरल’ अशीही आहे. जनरल झिया उल हक यांच्याप्रमाणे मुनीर यांनीही भारताविरुद्धच्या कारवायांना जिहादचे रूप दिले आहे. पण त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे पाकिस्तानात सध्या त्यांच्याच मदतीने शाहबाझ शरीफ सरकार राज्य करत आहे. गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या, ते इम्रान खान तुरुंगात आहेत. बहुमत नसलेले शाहबाझ शरीफ सत्तेवर आहे. या मिंधेपणातूनही मुनीर यांना फील्ड मार्शल हुद्दा दिला असण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फील्ड मार्शल… त्यांचे नि आपले!

पाकिस्तानचे पहिले फील्ड मार्शल आयुब खान यांनी स्वत:च स्वत:ला हा बहुमान दिला! पुढे १९६५ युद्धात त्यांना काही लढायांत नामुष्की पत्करावी लागली. जनरल मुनीर यांनाही नामुष्कीजनक संघर्षातून फील्ड मार्शल बनवले गेले. याउलट सॅम मानेकशॉ आणि जे. एम. करिअप्पा यांना अनुक्रमे १९७१ आणि १९४७मधील युद्धांत कुशल नेतृत्व केल्याबद्दल फील्ड मार्शल हुद्दा बहाल करण्यात आला. तर १९६५च्या युद्धात भारतीय हवाई दलाचे नेतृत्व केल्याबद्दल अर्जन सिंग यांना ‘मार्शल ऑफ दि एअरफोर्स’ हुद्दा बहाल करण्यात आला. तिन्ही हुद्दे पंचतारांकित, पण युद्धांतील मर्दुमकीबद्दल देण्यात आले.