दरवर्षी तुंबणारी मुंबई आणि दरवर्षी मुंबईकरांना सहन करावा लागणारा मनस्ताप हे चित्र आता नेहमीचं वाटावं इतकं नियमित दिसू लागलं आहे. मात्र, मुंबईसारखीच परिस्थिती यंदा दक्षिणेतील महत्त्वाचं शहर असलेल्या बंगलुरूमध्ये निर्माण झाली आहे. तुंबलेल्या मुंबईसारखीच तुंबलेल्या बंगळुरूची चित्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. बंगळुरुमधील पूरस्थिती राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये निर्माण झालेली पूर परिस्थिती, तिच्यामागची कारणं आणि स्थानिक प्रशासनाकडून केले जाणारे उपाय यांचा हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूमध्ये बेलंदूर, वरथूर, सौल केरे आणि कैकोंड्रहल्ली तलावांच्या पाण्यामुळे पुरस्थिती तयार झाली. यानंतर पुन्हा एकदा पुराच्या कारणांचं विश्लेषण सुरू झालं आहे. बंगळुरूमधील स्थितीबाबत विविध पाण्याच्या स्रोतांची एकमेकांशी असलेली नैसर्गिक जोडणीचा विषय महत्त्वाचा मानला जात आहे. शहरातील विविध तलावांमधील पाणी एकमेकांमध्ये जाऊन प्रवाही राहत नसल्याने ही स्थिती निर्माण होत असल्याचं जाणकार सांगत आहेत. दुसरीकडे कर्नाटक राज्य सरकारने जून २०२० मध्ये बेलंदूर आणि वरथूर तलावांचं काम हाती घेतलंय. मात्र, अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही.

इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्स या संस्थेतील सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सचे डॉ. टी. व्ही. रामचंद्र म्हणाले, “बंगळुरूमधील पुरस्थितीमागील मोठं कारणं शहरातील तलावांचा एकमेकांशी संपर्क तुटणं हे आहे.” १८०० मध्ये बंगळुरूमध्ये ७४० चौरस किमी परिसरात एकूण १४५२ तलाव होते. त्यांची पाणी साठवणूक क्षमता ३५ टीएमसी होती. त्यामुळे पावसाच्या पाण्याचं संधारण आणि पूराची तीव्रता कमी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

“सध्या बंगळुरूमध्ये केवळ १९३ तलाव आहेत आणि या सर्वांचा एकमेकांशी संपर्क नाही. अतिक्रमण आणि सांडपाण्याची गटारं यामुळे या तलावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तलावांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. तलावांमध्ये साचलेला गाळही त्या तलावाची साठवणूक क्षमता कमी करतो,” अशीही माहिती डॉ. रामचंद्र यांनी दिली.

पावसानंतर पाणी आपल्या नैसर्गिक मार्गाने लहान लहान पाण्याच्या स्रोतांमधून मोठ्या स्रोतांकडे गेल्यास पुराची स्थिती नियंत्रणात येऊ शकेल. त्यामुळे या तलावांचं आणि पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहांचं संरक्षण करण्याची आवश्यकताही अधोरेखित केली जात आहे.

बेलंदूर-वरथूरमधील ओलसर जमिनीचाही आता बांधकामांसाठी वापर होत आहे. हे अतिक्रमण २००४ पासून सुरू झालं आणि २००८ नंतर हे मोठ्या प्रमाणावर वाढलं. यामुळे आधी गटारं आणि नंतर तलावं दोन्हींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं. त्यामुळे तेथील परिसंस्थाही धोक्यात आली आहे, अशी माहिती रामचंद्र यांनी दिली. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, शहरातील बेलंदूर तलावाला जोडणाऱ्या प्रवाहाची रुंदी ६० मीटरवरून २८.५ पर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे अती पावसाच्या स्थितीत शहरातील पाणी वाहून नेण्याची क्षमता कमालीची कमी झाली आहे.

२०२१ च्या कॅगच्या अहवालातदेखील बंगळुरूमधील जलस्रोतांचा एकमेकांशी नसलेला संबंध यावर काळजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच पाणी मोकळ्या पद्धतीने प्रवाहीत होत नसल्यानेच तुंबून शहरात पुरस्थिती तयार होत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. बंगळुरू विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलंदूर-वरथूर तलावाच्या गाळगाढणीचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्षे लागेल. ही दिरंगाई होण्यामागील मुख्य कारण तलावातील गाळ कुठे टाकायचा याची निश्चित जागा नसणे हे आहे.

हेही वाचा : विश्लेषण : विदर्भात इतक्या वर्षांत प्रथमच अनेक ठिकाणी पूरस्थिती कशी?

अतिक्रमणाचा प्रश्न

बंगळुरू शहरात ६००० पेक्षा जास्त ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं आराखड्यांवरून स्पष्ट झालं आहे. यातील २२ बांधकामं तर थेट तलावांच्या जागांवर झाले आहेत. या प्रकरणांमध्ये अतिक्रमण हटवण्याचे आदेश असतानाही ते हटवता आलेले नाही. अतिक्रमण हटवण्याला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on bengaluru flood situation and reasons behind it pbs
First published on: 09-09-2022 at 15:33 IST