Maharashtra religious sites development: राज्य सरकार महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी ४,८२० कोटी खर्च करणार आहे. गेल्या महिन्यात अहिल्यानगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच २०२७ साली होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन केली जाणार आहे. ही संस्था उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयागराज प्राधिकरणाच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोणत्या धार्मिक स्थळांचा यात समावेश असणारा आहे आणि त्यांचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय याचा घेतलेला आढावा.
कोणत्या धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे?
तुळजापूर भवानीचे मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, माहूरगड, त्र्यंबकेश्वर, अष्टविनायक या प्रमुख धार्मिक स्थळांची निवड महाराष्ट्र सरकार करत असलेल्या धार्मिक स्थळांच्या विकासाच्या यादीत करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर
तुळजापूर मंदिरासाठी राज्य सरकारने १,८६५ कोटी मंजूर केले आहेत. तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थित आहे. हे मंदिर देवी भवानीचे एक प्रमुख शक्तीपीठ मानले जाते. देवीने इथे महिषासुराचा वध केला होता, अशी मान्यता आहे. या मंदिराचा इतिहास साधारणत: १२ व्या शतकात चालू होतो. छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजाभवानी ही कुलदेवता होती. शिवाजी महाराजांना देवीने स्वराज्य स्थापनेसाठी तलवार प्रदान केली होती असे मानले जाते. त्यामुळे या मंदिराला मराठा इतिहासात आणि जनमानसात विशेष धार्मिक व ऐतिहासिक स्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर मंदिराला भेट देतात. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठा उत्सव साजरा होतो.
महालक्ष्मी मंदिर
कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराच्या संवर्धनासाठी १,४४५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि अत्यंत पूजनीय शक्तीपीठ आहे. या देवीला ‘अंबाबाई’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर इ.स. ६२७ मध्ये चालुक्य राजा कर्णदेव याने बांधल्याचे मानले जाते. मंदिराची वास्तुरचना ही हेमाडपंथी शैलीतील असून काळ्या दगडातील आहे. देवीची मूर्तीही अत्यंत प्राचीन असून ती खडकात कोरलेली व शाळिग्राम दगडाची आहे. कोल्हापुरात देवी महालक्ष्मीने दैत्य कोल्हासुराचा वध केला म्हणून या शहराला ‘कोल्हापूर’ हे नाव पडले. या मंदिराला शक्तीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. दरवर्षी नवरात्रोत्सव, किरणोत्सव आणि मोठ्या प्रमाणावर यात्रांचे आयोजन केले जाते. हे मंदिर महाराष्ट्रातील अध्यात्म, इतिहास आणि स्थापत्यशास्त्र यांचा समृद्ध संगम दर्शवते.
माहूरगड
नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे तीन डोंगर असलेले धार्मिक स्थळ विकसित करण्यासाठी ८२९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी रेणुका देवीचे मंदिर हे तीन मंदिरांपैकी एक आहे. माहूरगड हे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात वसलेले एक प्राचीन आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथे देवी रेणुका माता यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. रेणुका माता या भगवान परशुराम यांच्या आई असून, त्यांना शक्तीस्वरूप मानले जाते. त्यामुळे माहूर हे देवीच्या उपासकांसाठी अत्यंत पवित्र क्षेत्र मानले जाते. माहूरगड हे तीन डोंगरांवर वसलेले असून त्यामध्ये रेणुका देवी मंदिर, अनुसया माता मंदिर आणि दत्तात्रेय मंदिर अशी तीन महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. हे क्षेत्र त्रिगिरी म्हणूनही ओळखले जाते. इतिहासात माहूरगडचा उल्लेख अनेक वेळा येतो. सहाव्या शतकातील चालुक्य राजांच्या काळात येथील मंदिरांचे पुनर्निर्माण झाले असावे, असा अंदाज आहे. पुढे यादव, बहमनी आणि निजामशाही काळातही माहूर क्षेत्र धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात होते. आजही हजारो भाविक येथे रेणुकामातेच्या दर्शनासाठी येतात, विशेषतः नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. माहूरगड हे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचे सुंदर मिलनस्थान मानले जाते.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासाठी २७५ कोटी तर कोल्हापूरमधील श्री ज्योतिबा देवस्थानासाठी २५९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गावात वसलेले असून, भगवान शंकराचे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम मानला जातो, त्यामुळे याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या मंदिराचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये, विशेषतः शिवपुराणात, आढळतो. येथे असलेले ज्योतिर्लिंग त्रिमुखी आहे. मंदिराची मूळ रचना प्राचीन असून, इ.स. १७४० च्या सुमारास पेशव्यांनी या मंदिराचे पुनरुत्थान केले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत काळ्या दगडात बांधलेले असून, शास्त्रशुद्ध वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. त्र्यंबकेश्वर मंदिर हे शिवभक्तांसाठी केवळ उपासनेचेच नव्हे, तर भारतीय संस्कृतीतील धार्मिक परंपरेचेही एक भव्य प्रतीक आहे.
अष्टविनायक
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी सात मंदिरांच्या विकासासाठी सरकारने १४७ कोटींची तरतूद केली आहे. या मंदिरांमध्ये मयुरेश्वर मंदिर (मोरेगाव), सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक), बल्लाळेश्वर मंदिर (पाली), वरदविनायक मंदिर (महाड), चिंतामणि मंदिर (थेऊर), विघ्नेश्वर मंदिर (ओझर) आणि महागणपती मंदिर (रांजणगाव) यांचा समावेश आहे. राज्यातील आठव्या अष्टविनायक मंदिराचा म्हणजेच गिरीजात्मज लेण्याद्री मंदिराचा मात्र या यादीत समावेश नाही.
राज्य सरकारने धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचे जतन आणि ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे सौंदर्य वाढणार नाही, तर स्थानिक रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, आणि पर्यटन वाढीसही चालना मिळेल. मात्र, सध्याच्या आर्थिक टंचाईच्या पार्श्वभूमीवर या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी हीच खरी कसोटी ठरणार आहे. धर्म आणि विकास यांच्यातील समतोल साधण्याचे हे मोठे आव्हान सरकारपुढे उभे आहे.