What is Wet Drought Or Ola Duskhkal: दिवाळीच्या तोंडावर राज्यातील राजकारण हे ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरुन चांगलेच तापले आहे. अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यासंदर्भातील मागणी केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या विषयावरुन राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? तो कधी आणि कसा जाहीर करतात? सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे का? तो जाहीर केल्याने काय होणार? हे आणि असे अनेक प्रश्न सर्वसमान्यांना पडले आहेत. याच प्रश्नांवर टाकलेली नजर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुष्काळ म्हणजे काय?
दुष्काळ या शब्दाची अगदी सोप्या भाषेत व्याख्या सांगायची झाल्यास ठराविक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या मानवी वस्तीला पिण्याचं पुरेसं पाणीही मिळेनासं होण्याइतकी पाणी टंचाई निर्माण होतं. यामध्ये नैसर्गिक परिस्थितीबरोबरच मानवी हस्ताक्षेपामुळेही काही ठिकाणी दुष्काळ पडतो असं वेळोवेळी वेगवेगळ्या उदाहरणांमधून दिसून आलं आङे. सामान्यपणे ही दुष्काळ म्हणजे पाणी टंचाई असं समजलं जातं. त्यातही दुष्काळ म्हटलं की कमी पाऊस, उष्ण व गरम हवामान, कोरडे वारे वगैरे यासारख्या गोष्टींचा विचार सर्वात आधी मनात येतो. खरं तर दुष्काळ ही पूर्णपणे वातारणातील, हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेली परिस्थिती असते. अगदी शासकीय किंवा मागणी आणि पुरवठ्याच्या परिभाषेत सांगायचं झाल्यास पाण्याची मागणी आणि त्याचा पुरवठा यामध्ये असणारी तफावत म्हणजे दुष्काळ.

दुष्काळाचे प्रकार किती?
सामान्यपणे पाहिल्यास दुष्काळाचे दोन प्रकार पडतात एक सुका दुष्काळ आणि दुसरा ओला दुष्काळ. पाणी टंचाई निर्माण होते त्या परिस्थितीला सुका दुष्काळ असं म्हटलं जातं. या परिस्थितीमध्ये अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीसाठीच्या पाण्यापर्यंत सर्वच प्रकारची टंचाई निर्माण होते. अनेकदा पेरणी केल्यानंतर पाऊस पडत नाही आणि पिकं जळून जातात. जमिनीला पाणी न मिळाल्याने मोठ्या भेगा पडल्याचीही उदाहरणं आहेत. या परिस्थितीमध्ये उष्णता आणि हवेतील दमटपणा अधिक असतो.

सुक्या दुष्काळ्याच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजेच अती प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचा शेतीला फटका बसला तर त्याला ओला दुष्काळ असं म्हणतात. त्यामुळेच सामान्यपणे ओला दुष्काळ ही संज्ञा ग्रामीण भागासाठी वापरली जाते. म्हणजेच शहरी भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर जाहीर करा किंवा अशाप्रकारच्या मागण्या ऐकायला मिळत नाहीत कारण अती जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाचा संबंध शेतमालाच्या नुकसानाशी जोडला जातो त्या वेळी ओला दुष्काळ हे शब्द वापरले जातात.

ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? याचे निकष काय?
सामान्यपणे दुष्काळ म्हटल्यावर कोरडी जमीन, पाण्याची कमतरता असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र ओला दुष्काळ ही कोरड्या दुष्काळाच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असते. एकाद्या ठराविक क्षेत्रामध्ये काही काळ सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतमाल आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. अतिवृष्टीमुळे पिकं वाहून जातात, शेतमाल खराब होतो, जागोजागी पाणी साचतं, शेतातील माती वाहून जाते यासारख्या परिस्थितीला सामान्यपणे ओला दुष्काळ असं म्हणतात. अगदी आकडेवारीनुसार सांगायचं झाल्यास एका दिवशी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्‍त पाऊस असेल, तर त्‍याला अतिवृष्‍टी संबोधतात. तसेच या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास तो भाग ओला दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखता जातो. सध्याच्या सरकारी नियमांनुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागामध्ये कोरडवाहू शेतीसाठी प्रती हेक्टर १३ हजार रुपयांच्या आसपास मदत केली जाते तर बागायती शेतीसाठी १८ हजार प्रती हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

सरकार टाळाटाळ करतंय का?
विरोधकांकडून जरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली, सरकार टाळाटाळ करत असल्याचे आरोप होत असले तरी अशापद्धतीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूदच अस्तित्वात नाही. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातल्या इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पण, ओला दुष्‍काळ जाहीर करण्‍याची तरतूदच नसून दुष्‍काळ संहिता ही फक्‍त कोरड्या दुष्‍काळाबद्दल आहे. एका दिवशी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्‍त पाऊस असेल, तर त्‍याला अतिवृष्‍टी संबोधतात आणि पूर-अतिवृष्‍टीमुळे नुकसानभरपाईचे निकष केंद्र सरकारने न बदलल्‍याने तोकडी मदत मिळते, असा महाराष्‍ट्र राज्‍य किसान सभेचा आक्षेप आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra rain what is wet drought or ola dushkal know types of drought and information in marathi scsg
First published on: 20-10-2022 at 15:19 IST